बोंडअळी
बोंडअळी

खानदेशात सव्वातीन लाख हेक्टरवरच बोंड अळी

पंचनामे धरसोड पद्धतीने केले. जी व एच अर्जांचा घोळ घातला गेला. शासन विमा कंपनीकडून भरपाई मिळवून देणार आहे. ही भरपाई निम्म्याच शेतकऱ्यांना कशी मिळेल, याचे नियोजन सरकार व सरकारी यंत्रणा आतापासूनच करीत आहेत. हा सगळा सावळा गोंधळ वाटतो. - गुलाबसिंग राजपूत, शेतकरी, तळोदा, जि. नंदुरबार

जळगाव ः गुलाबी बोंड अळीने कापसाचे पीक हातचे गेले असून, ९० ते ९५ टक्के क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत होता. परंतु अलीकडेच कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार खानदेशातील कापसाखालील निम्मे क्षेत्रही गुलाबी बोंड अळीने बाधित झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थातच अधिकाधिक कापूस उत्पादकांना भरपाईपासून किंवा शासन, विमा संस्था आदींच्या निधीपासून वंचित ठेवण्याचा प्रकारच जणू कृषी विभागाने केला आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.  कापसाची उत्पादकता घसरली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे. कोरडवाहू कापूस उत्पादक खानदेशात अधिक आहेत. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात दोन लाख पाच हजार, जळगाव जिल्ह्यात चार लाख ७५ हजार, तर नंदुरबार जिल्ह्यात एक लाख २० हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. खानदेशात सुमारे आठ लाख हेक्‍टरवरवर लागवड झाली होती. यापैकी जळगाव जिल्ह्यातील दोन लाख ६९ हजार हेक्‍टर, नंदुरबारमधील १० हजार आणि धुळ्यातील फक्त ३७ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. अर्थातच एकूण तीन लाख २० हजार हेक्‍टर क्षेत्र गुलाबी बोंड अळीने बाधित झाल्याचे यातून समोर आले आहे. परंतु बाधित क्षेत्र यापेक्षा अधिक असल्याचे शेतकरी, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  ज्या शेतकऱ्यांनी एच प्रकारचे अर्ज कृषी विभागाकडे दाखल केले होते, त्याची पाहणी जिल्हा तक्रार निवारण समितीने केली आहे. या समितीला खानदेशात दोन हजार ५७२ हेक्‍टर क्षेत्र बाधित असल्याचे दिसून आले आहे. 

जळगावमधून अधिक तक्रारी  कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी जळगाव जिल्ह्यातून अधिक आल्या असून, दोन लाख ८६ हजार ९०० तक्रारी आल्या आहेत. धुळ्यातून २१ हजार ८४८ आणि नंदुरबारमधून सुमारे सात हजार ४०० तक्रारी आल्याची माहिती मिळाली.  सर्वत्र प्रादुर्भाव; मग क्षेत्र निम्मेच बाधित कसे? खानदेशात सर्वत्र दिवाळीनंतर कापसावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रकोप झाला. त्याचे सुरवातीला कृषी विभागाचे अधिकारी व संबंधित ९० टक्के क्षेत्र बाधित असल्याचे म्हणत होते. परंतु आता बाधित क्षेत्र निम्मेच कृषी विभागाने कसे व कोणत्या आधारावर दाखविले, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com