हमीभावाने तूर खरेदी म्हणजे सरकारची थापेबाजी : कांबळे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वर्धा : हमीभावाने तूर खरेदी ही सरकारची थापेबाजी असल्याचा आरोप आमदार रणजित कांबळे यांनी केला आहे. जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रे उद्‍घाटनानंतरच बंद असून, तीन खरेदी केंद्रांवर अत्यल्प तूर पोचल्याची टीकाही त्यांनी केली. भाजप सरकार थापेबाजीत आघाडीवर आहे. त्यात दीडपट भाव देण्याच्या नव्या थापेची नुकतीच भर पडल्याचे आमदार कांबळे म्हणाले. तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असल्याचा आव आणला जात आहे. परंतु हमीभावाने तूर खरेदीची घोषणादेखील फसवी असल्याचे ते म्हणाले. सरकारला शेतकऱ्यांविषयी इतकीच आस्था आहे, तर त्यांच्या तुरीची विनाअट खरेदी करावी. जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तूर खरेदीचा बोजवारा उडाल्याने सरकारचा उद्देश याविषयी प्रामाणिक नसल्याचे स्पष्ट होते.

जिल्ह्यात तूर खरेदीची दहा केंद्रे सुरू झाली. यातील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांमार्फत सुरू करण्यात आलेली सात केंद्रे अद्यापही बंद आहेत. शासकीय आकडेवारीनुसार मुहूर्ताला केवळ ५३.८४ क्‍विंटल तूर खरेदी झाली, तर व्हीसीएमएफची तीन खरेदी केंद्रे सोमवारपासून सुरू करण्यात आली.

यात केवळ ३४५.२० क्‍विंटल तुरीची खरेदी झाली. जिल्ह्यात २७०२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. त्या तुलनेत पहिल्याच आठवड्यात तुरीची अत्यल्प खरेदी झाल्याने सरकारच्या हेतूवरच शंका निर्माण होत असल्याचे आमदार रणजित कांबळे म्हणाले. यापूर्वी बारदान्याअभावी सरकारची खरेदी फसली होती. त्यानंतर कर्जमाफीचादेखील असाच बोजवारा उडाला. त्यात आता तूर खरेदीची भर पडणार असल्याचेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com