परभणी : शेतीमालाचे हमीभाव आणि बाजारभाव यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी भावांतर योजना सुरू करावी. तूर, हरभरा खरेदी पूर्णवेळ पुन्हा सुरू करावी. कापूस व इतर पिकांच्या बोगस बियाण्यांवर नियंत्रण ठेवावे आदीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे सोमवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शेती पपांना दिवसाच्या वेळी १० तास वीजपुरवठा करण्यात यावा. उसाचे एफआरपीप्रमाणे थकीत बिल व्याजासह अदा करण्यात यावे. या वर्षी कारखान्यांनी पहिला हप्ता जमा केलेला नाही. त्यावर प्रशासनाने कारवाई केलेली नाही. खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदीकरिता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे थकीत देणी व्याजासह अदा करावीत.
वन्य प्राण्यांनी केलेल्या पीकनुकसानीची भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे करण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये सुभाषराव देशमुख, सुरेंद्र अंबोरे, बळवंत कोठेकर, प्रकाश देशपांडे, नामदेव बुचाले, दिगंबर काळे, तुकाराम दहे, मोकिंदराव अंबोरे, राजेभाऊ होळकर, विजय कच्छवे, राजेभाऊ कदम, माणिकराव भुजबळ, माणिकराव ढाकरगे, सतिश चौधरी, सु. व्यं. नाईक, वसंत भुजबळ शे. सत्तार आदी सहभागी झाले होते.