ऊसदरासाठी वातावरण तापले

ऊसदरासाठी आंदोलनाचा भडका
ऊसदरासाठी आंदोलनाचा भडका

पुणे : उसाला ३४०० रुपये दर दिल्याशिवाय कोयता लावू दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. तरीही साखर कारखान्यांनी अद्यापही उसाचे दर जाहीर न केल्याने सोमवारी (ता. ३०) सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी ऊसतोड रोखून पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी केली. तसेच ऊस वाहतूक बंद पाडून तर ट्रकची हवा सोडून अांदोलनाचा भडका उडवला. पहिली उचल जाहीर करावी आणि मगच उसाला कोयता लावावा, अन्यथा कारखानदारांविरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

सातारा जिल्ह्यात पडली  ठिणगी साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस घालू नये आणि साखर कारखानदारांनीही पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असा पवित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. ३०) पार्ले येथील ऊसतोड रोखली. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच स्वाभिमानीने ऊसदर आंदोलनाची ठिणगी या निमित्ताने टाकली आहे. कारखान्यांकडून पहिली उचल जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड घेऊ नये आणि जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनीही पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नये, असा पवित्रा घेत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, दादासाहेब यादव, अनिल घराळ, प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ व अन्य कार्यकर्त्यांनी पार्ले येथील ऊसतोड रोखली.

मंगळवेढ्यात उसाच्या ट्रॉलीची हवा सोडली सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही उसाचे दर जाहीर न केल्याने सोमवारी (ता. ३०) सकाळी अरळीतील शेतकऱ्यांनी उसाने भरलेल्या ट्राॅलीची हवा सोडल्याने ऊस दरावरून मंगळवेढ्यात अांदोलनाचा भडका उडाला अाहे. अरळी येथे ऊसतोड करून ट्राॅली भरून जात असताना माजी सरपंच मलसिद्ध कुंभार, अॅड. राजाराम चव्हाण, आप्पासो हेगडकर, कोली मेजर, मल्लिकार्जुन सोनगोंडे, बंडू ढाणे, अशोक कुंभार आदी १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

पंढरपूर तालुक्यात ऊस वाहने परत पाठविली सोलापूरमध्ये ऊस दर प्रश्‍नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊ लागले आहेत. "स्वाभिमानी'च्या महिला कार्यकर्त्यांनी रविवारी आक्रमक भूमिका घेत शिरढोण (ता. पंढरपूर) येथील ऊसतोड बंद करून युटोपियन शुगर व विठ्ठलराव शिंदे कारखान्यांची सहा वाहने परत पाठवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या वर्षी पहिली उचल तीन हजार ४०० रुपये द्यावी, अशी मागणी केली आहे.

सीमाभागात ऊस वाहतूक बंद पाडली कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराबाबत आंदोलन सुरू केले आहे. यामुळे जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) बहुतांशी शिवारे शांतच राहिली. अनेक ठिकाणी ऊसतोडणी मजुरांच्या ऊस टोळ्या दाखल झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात ऊसतोडणी सुरू असल्याचे चित्र नाही. कर्नाटक सीमा भागातील काही गावांत सुरू असणारी कर्नाटकातील कारखान्यांची ऊस वाहतूक सोमवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. जोपर्यंत दर मिळत नाही; तोपर्यंत तोडी सुरू होऊ न देण्याच्या घोषणा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

वड्डी येथे ऊसतोड रोखली सांगली जिल्ह्यातील साखर हंगाम सुरू झाला आहे. अनेक भागात कारखान्यांनी ऊसतोडणी सुरू केली आहे. पहिली उचल किती देणार हे जाहीर न करता साखर कारखान्यांनी ऊसतोडणी सुरू केल्याचा निषेध करत शेतकरी संघटनेने रविवारी (ता. २९) वड्डी (ता. मिरज) येथे तोड बंद पाडली. शेतकरी संघटनेने फडातून ऊसतोड कामगारांना परत पाठवले. सोमवारी (ता. ३०) दुपारपर्यंत कोठेही ऊसतोड रोखली नव्हती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com