शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणाऱ्या सरकारची मस्ती उतरवू ः तुपकर

रविकांत तुपकर
रविकांत तुपकर

पुणे  ः सरकारचे दूध पॅकेज ही शुद्ध धूळफेक आहे. फसवे पॅकेज, अटकेच्या धमक्या देत फोडा-फोडीची कुटील नीती वापरून शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणाऱ्या सरकारची मस्ती आम्ही उतरविणार आहोत. कोणत्याही धमक्यांना भीक न घालता आम्ही दोन हात करू. दूध प्रश्नावर सर्व शेतकरी संघटितपणे सोमवारपासून (ता. १६) बेमुदत संपाचा राज्यव्यापी लढा देतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे.

कोसळलेल्या दूध दराला सावरण्यासाठी राज्य सरकारने विधानसभेत दुधाच्या पॅकेजची घोषणा केली. त्यामुळे ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनातील हवा काढून घेण्यात आल्याची चर्चा होती. दुग्ध क्षेत्रातील तज्ज्ञ समितीने मागितलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे ‘स्वाभिमानी’कडून आंदोलन रद्द केले जाईल, असेही बोलले जात होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम आहे.

सरकारने दूध भुकटी निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलो, दूध निर्यातीसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान दोन महिने देण्याची घोषणा केली आहे. शासकीय पोषण आहारातही दुधाचा आणि दूध भुकटीचा समावेश करण्यात आला आहे. तूप व लोण्यावरचा जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंतीदेखील केली जाणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केवळ राजकारण करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही, असे एका खासगी दूध डेअरी उद्योजकाने स्पष्ट केले.

रविकांत तुपकर यांना मात्र सरकारी पॅकेज मान्य नाही. शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा आग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी धरला आहे. मात्र, शेतकऱ्यांना सोडून सरकारच्या मदतीने काही घटकांसाठी सरकारी तिजोरीवर दरोडा टाकणारे पॅकेज जाहीर झाले आहे. या पॅकेजमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आंदोलन होणारच, असे श्री. तुपकर म्हणाले.

आम्ही आंदोलन नेटाने करणार असून कोणी धमक्या दिल्या तर कायदा हातात घेऊ. आंदोलन करण्यासाठी खासदार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यभर दूध उत्पादकांच्या बैठका घेत आहोत, असे श्री. तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांबरोबर सभा व बैठका घेण्यासाठी श्री. तुपकर यांनी दौरा आखला असून उस्मानाबाद, परांडा, जामखेड, मंगळवेढा, सांगोला, फलटण आणि बारामती भागात फिरून ते आंदोलनाची दिशा ठरविणार   आहेत.  

...तर डेअरीचालक खासदार शेट्टींबरोबर ः कुतवळ  महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, की पॅकेज हे एक सोंग आहे. मुळात राज्यातील शेतकरी संकटात असून त्यांना पाच रुपये अनुदान देण्याऐवजी खासगी प्लांटचालकांना ५० रुपये अनुदान देण्याचा प्रकार अचंबित करणारा आहे. आजार शेतकऱ्याला आणि इंजेक्शन दूध पावडर प्लांटचालकाला देऊन काहीही साध्य होणार नाही. डेअरी उद्योगाच्या टॅंकरची तोडफोड होणार नसल्यास आम्ही सर्व जण खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत जाण्याचा विचारात आहोत.

दूध निर्यात किंवा पावडर निर्यातीला पॅकेज देऊन दुधाचे दर वाढणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांनाही काहीच फायदा होणार नाही. हा आत्मघातकी उपाय असून डेअरीचालकांचे नुकसान न होता ते शेतकरी वर्गाची बाजू मांडत असल्यास आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. शेतकरी हाच पोशिंदा आहे. तो टिकला तर दूध उद्योग टिकेल हीच आमची भूमिका आहे, असेही श्री. कुतवळ यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com