वस्त्रोद्योग विभागाकडे बोंड अळीच्या प्रतिकारासाठी मागितली मदत

बोंडअळी
बोंडअळी

पुणे : खरिपाच्या पुढील हंगामातदेखील गुलाबी बोंड अळीचे संकट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बोंड अळी रोखण्याच्या कामात जिनिंग उद्योगाला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्याच्या वस्त्रोद्योग संचालकांसमोर ठेवला आहे. गुलाबी बोंड अळीने राज्यातील ३२ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे यंदा नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, कंपन्यांवर कारवाई, विधिमंडळात विरोधकांचा भडिमार अशा विविध समस्या केवळ बोंड अळीमुळे राज्य सरकारसमोर तयार झालेल्या आहेत. पुढील हंगामातदेखील राज्यात बोंड अळीची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे शासनाकडून प्रतिबंधकात्मक उपाय आतापासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.  ‘‘पुढील हंगामात गुलाबी बोंड अळी रोखायची असल्यास कापूससाठा असलेल्या जागांपासूनच व्यवस्थापन सुरू करावे लागेल. या कामासाठी राज्यातील सर्व जिनिंग व प्रेसिंग उद्योगाची मदत अत्यावश्यक आहे. त्याशिवाय बोंड अळीला रोखता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कृषी आयुक्तांनी स्वतः राज्याच्या वस्त्रोद्योग संचालकांशी संपर्क साधून मदत मागितली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  ‘‘राज्यातील जिनिंग-प्रेसिंग मिल्समध्ये प्रकाश सापळे आणि कामगंध सापळे लावावेत व त्यात अडकलेले पतंग नष्ट करण्यासाठी मिल्स उद्योगाला सूचना द्याव्यात,’’ असे कृषी आयुक्तांनी वस्त्रोद्योग संचालकांना तातडीने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.  ‘‘बोंड अळीची लागण झालेला कापूस मोठ्या प्रमाणात सध्या जिनिंग प्रेसिंग मिल्सकडे जात आहे. तेथे कामगंध सापळे लावून नर पतंग नष्ट केल्यास बोंड अळीची उत्पत्ती थांबू शकेल. त्यामुळे या उपाययोजना राबविण्यासाठी जिनिंग उद्योगाला सूचना द्याव्यात. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त काम करावे लागेल. या कामाचे वस्त्रोद्योग विभागानेदेखील संनियंत्रण करावे,’’ असेही आयुक्तांनी वस्त्रोद्योग संचालकांना सुचविले आहे.  वस्त्रोद्योग विभागाला सुचविलेले उपाय

  • राज्यातील जिनिंग प्रेसिंग मिल्सकडून जानेवारीपासून ते हंगाम संपेपर्यंत ५० ते १०० पर्यंत कामगंध सापळे लावावेत
  • जिनिंग मिलच्या परिसरात ५ ते १५ प्रकाश सापळे लावून नर व मादी आकर्षित करून नायनाट करावा 
  • या कामासाठी जिनिंग मिलवर एका कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देऊन सापळ्यांबाबत जबाबदारी सोपवावी. 
  • हंगाम संपेपर्यंत परिसर स्वच्छ ठेवून तुटलेल्या कापूस बिया व कापूस कचरा नष्ट करावा
  • कापसाची साठवण जास्त दिवस करू नये. यामुळे पुढील हंगामात बोंड अळी रोखण्यास मदत होऊ शकते.
  • कामगंध सापळे लावण्यासाठी पेस्ट कंट्रोल ऑफ इंडियाची मदत घ्यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com