पुणे ः शेतीकामांसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी कृषी विभागाने कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. चालू वर्षीपासून उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत पुणे विभागातील ६५९३ शेतकऱ्यांना विविध अवजारांचे वाटप केले आहे. त्यासाठी ४२ कोटी ७० लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
पीक उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर अवजारे देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एकाच वेळी शेतकऱ्यांना अवजारे देण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला गेला. त्यानुसार कृषी विभागाने सुधारित कार्यक्रम तयार करून निधीची तरतूद केली.
या निधीतून शेतकऱ्यांसाठी आवश्यक ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित लागवड यंत्र, रिपर, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर अशी विविध अवजारे देण्यात येणार होती. त्यासाठी २५ ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार होते. पुणे विभागासाठी कृषी विभागाने एकूण ६१ कोटी १४ लाख रुपयांचा सुधारित कार्यक्रम तयार केला होता. त्यासाठी ४८ कोटी ४६ लाख ९९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.
कृषी विभागाने अर्जाची मागणी केल्यानंतर पुणे विभागातून तब्बल ३६ हजार ७७८ अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी ३०७ कोटी ५७ लाख ५८ हजार रुपयांची आवश्यकता होती. अर्जांची छाननी केल्यानंतर २३ हजार ३३८ हजार शेतकऱ्यांना निवड पत्र देण्यात आले. १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिल्याचे कळविण्यात आले.
मात्र, पूर्वसंमती दिल्यानंतर प्रत्यक्षात सहा हजार ५९३ शेतकऱ्यांनी अर्जाची खरेदी केली असून त्यांना ४२ कोटी ७० लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना ही अवजारे खरेदी केल्यानंतर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी अजून सहा कोटी ५० लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान शिल्लक असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.