सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार २७ शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या अवजारांसाठी १५ कोटी ४३ लाख ५५ हजार ३३३ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर टंचाई भासत असल्याने तसेच पीक उत्पादन वाढीसाठी शासनाकडून यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला होता. या यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. या मोहिमेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.
जिल्ह्यातील ११ हजार १७३ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. निधीच्या तुलनेत जास्त अर्ज आल्याने लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची नावे काढून पहिल्या सात हजार १७६ शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून टप्प्याटप्प्याने पूर्वसंमती देण्यात आली होती. यातील मार्चअखेर दोन हजार २७ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अवजारे खरेदी केल्याने त्यांना अनुदान म्हणून १५ कोटी ४३ लाख ५५ हजार ३३३ रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.
या योजनेत सर्वाधिक ५३६ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेली आहे. त्यानंतर ५०१ शेतकऱ्यांनी पॉवर टिलरची तर ९०४ शेतकऱ्यांनी इतर अवजारे खरेदी केली आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून ७६ शेतकऱ्यांना अवजारे देण्यात आली आहेत.
मुदतीत खरेदीत झालेल्या अवजारे व ट्रॅक्टरची कृषी विभागाकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोका तपासणी केली जात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जात असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.