शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विद्यापीठांनीच पुढाकार घ्यावा

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विद्यापीठांनीच पुढाकार घ्यावा
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विद्यापीठांनीच पुढाकार घ्यावा

दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कृषी विद्यापीठांनाच पुढाकार घ्यावा लागेल. शास्त्रज्ञांनी फक्त वाण काढून उपयोग नसून, आपल्या कामाची चौकट सोडून विद्यार्थ्यांना बरोबर घेत गरजेनुसार शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचवावे लागेल. लागवड खर्च कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी झपाटून काम केले तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आत्महत्यादेखील कमी होतील, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांनी येथे  केले.  दापोलीमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजिलेल्या ४६ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या तीनदिवसीय बैठकीस गुुरुवारी (ता. २४) प्रारंभ झाला. या वेळी उद्‍घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वार्ष्णेय बोलत होते.  कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, कृषी परिषदेचे संचालक रवींद्र जगताप, संचालक डॉ. हरिहर कौसडीकर व डॉ. विठ्ठलराव शिर्के तसेच सर्व विद्यापीठांचे संशोधन, विस्तार शिक्षण संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.   गुजरातच्या कामधेनू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वार्ष्णेय यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात विद्यापीठांचे कान टोचले. ‘‘शेतकरी आत्महत्या ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपण संशोधन कष्टाने करतो. तरीही ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे कृषी संशोधनाच्या प्रसारासाठी विद्यार्थ्यांची मदत घ्यावी लागेल. कृषी शिक्षणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या कोशातून बाहेर काढून गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाठविण्याची वेळ आली आहे,’’ असे ते म्हणाले.  मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनीही बैठकीत महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. ‘‘विद्यापीठांनी आता बाजार व्यवस्था, कृषी अर्थव्यवस्थापन, मूल्यवर्धन, प्रक्रिया तसेच वर्तमानातील गरजांवर आधारित संशोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठांनी भले सल्लागारांची देखील मदत घ्यावी,’’ असे ते म्हणाले.  ‘‘महाराष्ट्राची अॅग्रेस्कोची परंपरा देशात सर्वोत्तम आहे. या माध्यमातून हजारो शिफारशी झालेल्या असून त्याचा वापर शेतकरी करीत आहेत. मात्र, सर्व शिफारशी वापरल्या जात नाहीत. त्यामुळे आपण किती शिफारशी केल्या व त्यातील किती वापरल्या गेल्या आणि किती शिफारशींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे याचा व्यवस्थित आढावा घेण्याची वेळ आली आहे,’’ असेही मत त्यांनी नोंदविले.  संशोधनाची चौकट ओलांडण्याचा आग्रह धरताना डॉ. व्यंकटेश्वरलू म्हणाले, ‘‘४० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडे चांगले वाण, कीड-रोग, खते-सिंचन व्यवस्थापनाविषयी माहिती नव्हती. आता ही सर्व माहिती शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, शास्त्रज्ञ अजूनही याच माहितीभोवती संशोधन करीत आहेत. त्यामुळे आपल्याला संशोधनाचे प्राधान्यदेखील ठरविण्याची गरज आहे.’’ बैठकीच्या पहिल्या दिवसात शास्त्रज्ञांनी विद्यापीठांमधील विविध कामांचा आढावा घेतला. आज (ता. २५) विविध संशोधनावर तांत्रिक चर्चासत्रे होत असून उद्या शिफारशींवर शिक्कामोर्तब केले जाईल. इतर कोणत्याही अॅग्रेस्कोपेक्षा दापोलीतील बैठकीची व्यवस्था उत्तम असल्याचे सांगत सर्व कुलगुरूंनी दापोलीचे कुलगुरू डॉ. भट्टाचार्य यांचे भरभरून कौतुक केले. 

फक्त वाण काढून उपयोग नाही माजी कुलगुरू डॉ. वार्ष्णेय यावेळी म्हणाले की, ‘‘फक्त वाण काढून उपयोग नाही. शेतकऱ्याचा लागवड खर्च कमी करण्यासाठी कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांनी झपाटून काम केले तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. मी फक्त पैदासकार असून फक्त बियाणे पैदाशीकडेच लक्ष देईल. मी मृदाशास्त्रज्ञ असून माती सोडून मला इतर काही माहित नाही, अशी भूमिका घेणे आता कृषी शास्त्रज्ञांनी बंद करावे. मी वेतन घेतो. दर्जेदार संशोधन शेतकऱ्यांपर्यंत नेण्याबरोबरच चौकटीबाहेर पडून कामे करेल असे तुम्ही ठरवा. तसे केले तर देश तुमचा ऋणी राहील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com