अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात उत्साहात प्रारंभ

जालना ः जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर ॲग्रोवन प्रदर्शनाचे उद्घाटन करताना.
जालना ः जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर ॲग्रोवन प्रदर्शनाचे उद्घाटन करताना.

जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला शुक्रवारी (ता. १९) जालना येथील आझाद मैदानावर प्रारंभ झाला. प्रदर्शनाचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी केले.

उद्‌घाटन सत्राला माजी मंत्री राजेश टोपे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक अधिकारी कृषी दशरथ तांभाळे, सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील, आैरंगाबाद रेशीम कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अजय मोहिते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड आणि मे. बी. जी. चितळे डेरीचे पशुतज्ज्ञ चंद्रशेखर कुलकर्णी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया तसेच कृषी विभाग जालना व आत्मा जालना या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

पहिल्याच दिवशी प्रदर्शनातील दालनास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेटी दिल्या. चर्चासत्रासदेखील उदंड प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनामध्ये एकूण ७८ दालने असून, यामध्ये यांत्रिक अवजारे, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीनहाउस तंत्रज्ञान, शेडनेट, पाॅलिहाउस तंत्रज्ञान, बियाणे उत्पादक, ठिबक, तुषार संच, पॅकेजिंग, कोल्ड स्टोरेज उद्योग, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, रोपवाटिका, कृषी प्रकाशने, पूरक उद्योग आदी दालनांचा समावेश आहे. सांयकाळपर्यंत मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांची प्रदर्शनाला भेट देण्यासाठी वर्दळ सुरू होती.

याप्रसंगी कृषी अधीक्षक तांभाळे म्हणाले, की शेतीमध्ये मनुष्यबळ मिळत नाही, त्यामुळे यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे. या प्रदर्शनामध्ये सर्व यांत्रिक उपकरणे उपलब्ध आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन या वेळी त्यांनी केले.

सकाळ-अॅग्रोवन कृषी विस्ताराचा मार्ग ः टोपे शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती सकाळ अॅग्रोवनच्या माध्यमातून पुरवली जात आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान अत्मसात करून शेती करीत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी सकाळ अॅग्रोवन वरदान ठरले आहे. अॅग्रोवनमध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांनी शेती पद्धतीमध्ये बदल केले आहेत. यामुळे उत्पादन वाढ होऊन, आर्थिक स्तर उंचावत आहे.

ॲग्रोवनमुळे आधुनिक शेती ः खोतकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर म्हणाले, की पूर्वी शेतीची माहिती मिळत नव्हाती. त्यामुळे पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीमध्ये शेती केली जात होती. परंतु अॅग्रोवनच्या माध्यमातून अधुनिक शेतीची माहिती सहजपणे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. पीक घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे अपेक्षित आहे. या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची प्रर्दशनाला भेट पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सकाळी कृषी प्रर्दशनाला भेट देऊन माहिती घेतली. विविध स्टाॅलला भेट दिली. काही शेतकऱ्यांशी चर्चा केली. अॅग्रोवन-सकाळचे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे श्री. खोतकर या वेळी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com