औरंगाबाद : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर बोंड अळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची सोमवारी (ता. ४) थेट बांधावर जाऊन पाहणी करत कृषी आयुक्त एस. पी. सिंग यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली.
मराठवाड्यात जवळपास साडेपंधरा लाख हेक्टरवर यंदा कपाशीची लागवड झाली आहे. लागवड झालेल्या कपाशीच्या एकूणच क्षेत्रावर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. या नुकसानीमुळे कृषी विभागाकडे जी फॉर्मच्या माध्यमातून तक्रारीचा अक्षरश: पाऊस पाडला जात आहे. औरंगाबाद जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत तक्रारींची संख्या लाखांच्या पुढे गेली आहे. ॲग्रोवनने रविवारी (ता. ३)च्या अंकात बोंड अळीने जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील कपाशीवर अवकळा आल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
त्यामध्ये एकूण पेरणी क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्र बाधित झाले असून, नुकसानीची पातळी, त्याचे निकष व शेतकऱ्यांना आधाराची असलेली गरज यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. ४) कृषी आयुक्त एस. पी. सिंग यांनी बोंड अळीने बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद व जालना जिल्हा गाठला.
औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद, फुलंब्री, औरंगाबाद तालुक्यातील काही गाव व शेतांना भेटी दिल्यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कडेगावला भेट दिली. या सर्व भेटीदरम्यान कृषी आयुक्तांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे, बोंड अळीची तीव्रता, त्यांची कारणे शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.
या दौऱ्यादरम्यान कृषी आयुक्तांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचीही भेट घेत त्यांच्याशी बोंड अळीसंदर्भातील परिस्थितीवर चर्चा केली. या दौऱ्यादरम्यान औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जालन्याचे अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उपविभागीय कृषी अधिकारी धमेंद्र कुलथे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, खुल्ताबादचे तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हंगे, सांख्यिकी अधिकारी कोलते अादी उपस्थित होते.