कोल्हापूर : शेतकऱ्यांना कृषीविषयक कीटकनाशकांची विक्री करत असताना सुरक्षा किट देणे हे उत्पादक कंपनी व विक्रेते यांची जबाबदारी आहे. ज्या कंपन्या सुरक्षा किट देत नसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. परवानाधारक दुकानांत बंदी असलेली कीटकनाशके विक्रीसाठी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (ता. १३) येथे दिल्या.
सांगली, कोल्हापूर, सातारा येथील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक श्री. खोत यांनी घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. यवतमाळसारखी घटना पुन्हा राज्यात घडू नये, यासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे.
यापुढे गावा-गावांत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक मेळावे घेण्यात येतील. कीटकनाशकांचा वापर कसा करावा, शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परवानाधारक दुकानांमध्ये ज्या कीटकनाशकांवर बंदी आहे अशी कीटकनाशके आढळल्यास त्या दुकांनावर कडक कारवाई करा. बंदी घातलेली कीटकनाशके कोणत्याही दुकानांमध्ये दिसता कामा नये, कारवाईमध्ये हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा श्री. खोत यांनी या वेळी दिला.या वेळी विभागीय सहसंचालक महावीर जंगटे, उमेश पाटील आणि श्री. ठाकूर उपस्थित होते.