कृषी विभागाच्या बदल्या यंदाही समुपदेशनाने

कृषी विभाग
कृषी विभाग

पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार यंदादेखील टळण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तालयाने समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्याबाबत तयारी पूर्ण केली असली, तरी निवडणूक आचारसंहितेमुळे तूर्त वेळापत्रक जाहीर झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.  कृषी विभागात वर्षानुवर्षे सोनेरी टोळीकडून मलिदा लाटून बदल्या केल्या जात होत्या. अनेक तक्रारी होऊनही या समस्येवर उपाय सापडला नव्हता. मात्र, तत्कालीन कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी गेल्या हंगामात बदल्या करताना समुपदेशन पद्धतीतून प्रथमच घोडेबाजार रोखला होता. “समुपदेश बदल्यांची मूळ संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे सर्व खात्यांमधील बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी समुपदेशन धोरण लागू केले. त्यामुळेच गेल्या हंगामात कृषी विभागात प्रथमच ‘देवघेव’ न होता बदल्या झाल्या,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील कृषी कर्मचाऱ्यांचे लक्ष आता समुपदेशान फेऱ्यांच्या वेळापत्रकाकडे लागून आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून समुपदेशन प्रक्रियेद्वारे ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जाणार आहेत. त्यात गट ‘ब’मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. तसेच, कृषी सहसंचालकांकडून समुपदेशाने गट क कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील.  “कृषी विभागातील चांगल्या कर्मचाऱ्यांची समुपदेश पद्धतीमुळे घोडेबाजारातून सुटका झाली आहे. तरीही काही मोक्याची पदे किंवा विशिष्ठ्य भौगोलिक क्षेत्रात पद मिळण्यासाठी थेट मंत्रालयातून ‘जॅक’ लावणारे अधिकारी बरेच आहेत. गेल्या हंगामात आयुक्तांनी बदल्या करूनदेखील अनेक कर्मचारी आयुक्तालयाचे आदेश झुगारून खुर्च्यांना चिकटून बसले,” असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  टेबल किंवा कक्ष बदलून ‘बदली’चे सोपस्कार राज्यात ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५’ असा कायदा लागू आहे. त्यानुसार, सहा वर्षांनंतर बदल्या केल्या जात होत्या. मात्र, नव्या धोरणानुसार तीन वर्षांत बदल्या होत आहेत. ‘बदली’ याचा अर्थ, शासकीय कर्मचाऱ्याची एका पदावरून किंवा एका कार्यालयातून किंवा एका विभागातून दुसऱ्या पदावर दुसऱ्या कार्यालयात किंवा दुसऱ्या विभागात होणारी पदस्थापना, असा आहे. मात्र, कृषी खात्यातील काही भ्रष्ट अधिकारी या संधीचा सोईस्कर फायदा घेत आहेत. आयुक्तालयापासून ते तालुका कार्यालयात फक्त एका विभागातून दुसऱ्या विभागात ‘समन्वया’ने बदल्या करून घेतल्या जातात. अनेक अधिकारी मलईदार जागा हेरून आयुक्तालयात, सहसंचालक किंवा एसएओ कार्यालयात वेटोळे घालून बसतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com