कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली सक्रिय

कृषी विभागात बदल्यांसाठी  'लॉबी' झाली सक्रिय
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली सक्रिय

पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी विभागातील बदल्या करण्यासाठी एक लॉबी सक्रीय झाली आहे. यासाठी आयुक्तालयावर देखील मंत्रालयातून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  कृषी विभागातील विनंती बदल्या रखडलेल्या आहेत. गंभीर स्वरूपाचे आजार, दुखापत असलेले कर्मचारी तसेच आई-वडिलांना व्याधी अशी पार्श्वभूमी असलेले कर्मचारी आशेने विनंती बदल्यांची वाट पहात आहेत. मात्र, घोडेबाजारात पटाईत असलेल्या लॉबीला भलत्याच बदल्यांमध्ये रस असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘‘मे २०१४, २०१५ आणि २०१७ मध्ये या तीन वर्षांत बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी कुणाला तीव्र स्वरूपाची समस्या असल्यास मुदतपूर्व बदल्या फेब्रुवारी २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे करता येत होत्या. त्यासाठी नागरी सेवा मंडळ दोनकडून नागरी सेवा मंडळ एककडे शिफारस जाणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर हा प्रस्ताव आयुक्तांकडून राज्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी जातो,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात बदल्यांसाठी ९ एप्रिल २०१८ रोजी शासनाने स्वतंत्र आदेश काढून समुपदेशानीची पद्धत जाहीर केली. समुपदेशानात विकल्पाप्रमाणे बदली मिळालेल्या कर्मचाऱ्याला सहा वर्षे बदली मागता येत नाही, असा देखील नियम आहे. अशा कर्मचाऱ्याला बदलीसाठी अर्जदेखील करता येत नाही. केलाच तर नागरी सेवा मंडळांनी तो स्वीकारू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

कृषी विभागातील बहुतेक विभागांनी या नियमाला हरताळ फासून असे प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविल्याचे सांगितले जाते. बदल्यांमधील एक लॉबी मलिदा लाटण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून धडपडते आहे. त्यासाठी एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने मंत्रालयातील एक अधिकारी आणि कृषी आयुक्तालयातील अधिकारी बदल्यांमध्ये घोळ घालत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

‘मुळात समुपदेशन बदल्यांमध्ये अन्याय वाटत असल्यास अशा कर्मचाऱ्याने ३० दिवसांत आयुक्तांकडे अपील करायचे आहे. चौकशीअंती अशा कर्मचाऱ्याला आधीच्या आदेशात बदल करून योग्य ठिकाणी बदली करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आलेले आहे. मात्र, लॉबीकडून आयुक्तांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. मुदतपूर्व बदल्यांमध्ये राज्यमंत्री किंवा उपसचिवदेखील हस्तक्षेप करू शकत नाही,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

विकल्प दिला तरी प्रशासकीय बदली शक्य  राज्य शासनाने दिलेल्या बदल्यांच्या नियमावलीतील टप्पा क्रमांक पाचमधील मुद्दा क्रमांक चारनुसार जरी कर्मचाऱ्याने विकल्प दिला तरी त्यानुसारच पदस्थापना मिळेलच असेही नाही. रिक्त पदे तसेच गरज लक्षात घेऊन कृषी विभागाकडून प्रशासकीय किंवा शासकीय कारणास्तव प्रशासकीय बदली करता येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com