जळगाव : जिल्हा परिषदेने मागील दोन वर्षांपासून बंद केलेला ‘करपा’ निर्मूलनासंबंधीचा निविष्ठा वितरण कार्यक्रम यंदापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वनिधीतून देय एक लाख रुपये निधीतून पात्र शेतकऱ्यांना या निविष्ठांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी एक लाख रुपये रक्कम मात्र तोकडी आहे. ती वाढविण्यात यावी अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी किमान ४२ हजार हेक्टरवर केळी पीक असते. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे पीक सुरक्षेसंबंधी केळी उत्पादकांना दरवर्षी करपा निर्मूलनाच्या निविष्ठांचे वितरण केले जायचे. त्यात बुरशीनाशके व इतर बाबींचा समावेश असायचा. पण फारसे लाभार्थी घेतले जात नव्हते. अशातच निधी तोकडा असतो म्हणून कृषी विभागाने हा कार्यक्रम बंद केला.
मागील दोन वर्षे हा कार्यक्रम बंद होता. तो का बंद पडला, अशी विचारणा मागील महिन्यातील स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली होती. त्यावर निधी असतो. पण लाभार्थींचा प्रतिसाद नव्हता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निधी कमी असला तरी जेवढ्या गरजू लाभार्थींना किंवा केळी उत्पादकांना निविष्ठा देता येतील तेवढ्या द्या, हा कार्यक्रम पुन्हा सुरू करा, अशी सूचना कृषी समितीचे सभापती नंदकिशोर महाजन व इतर सदस्यांनी केली होती.
याबाबतची दखल घेऊन हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे.
या निधीतून थेट अनुदान (डीबीटी) पद्धतीने लाभार्थींना लाभ दिला जाईल. निविष्ठांची खरेदी केळी उत्पादकांना करायची आहे. ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती मिळाली.