राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील कामांना आता गती मिळणार आहे. राज्यभरातील ३२ जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण करण्यासाठी तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या उपक्रमांतील कामांसाठी २०८ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. हा निधी या महिन्यात खर्च करण्याचे आदेश जलसंधारण विभागाने दिले आहेत. 

दुष्काळाच्या झळा सोसलेल्या गावांना आता पाण्याचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे जलसंधारण कामांसाठी सरकार राबवत असलेल्या विविध उपक्रमांत लोकसहभाग वाढल्याचा अलीकडील तीन वर्षांचा अनुभव आहे. सिंचनाच्या कामांवर गेल्या अनेक वर्षांपासून निधी खर्च होत असला, तरी त्याचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही. 

भाजप सत्तेत आल्यावर तीन वर्षांपूर्वी गावपातळीवर कामे करीत असलेल्या सिंचनाच्या विविध योजना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. पहिल्या दोन वर्षांत नाही; पण यंदा योजनेतून कामे झालेल्या गावांत चांगला प्रभाव दिसत आहे. सलग पाच वर्षे टॅंकर असलेल्या, दुष्काळाच्या गंभीर झळा सोसलेल्या गावांच्या निवडी ‘जलयुक्त’मध्ये झाल्या आणि या गावांचे भाग्य उजळले. 

नगर जिल्ह्यात पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २६४, तर यंदा २४१ गावांची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली आहे. २०१६-१७ व २०१७-१८ यावर्षी निवडलेल्या गावांत कामे केली जात आहेत. गतवर्षी निवडलेल्या गावांत सुरू असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जलसंधारण विभागाने नुकतेच २०८ कोटी रुपये संबंधित जिल्ह्याला वितरित केले आहेत. हा निधी अखर्चित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर जिल्ह्यासाठी चार कोटी रुपये ‘जलयुक्त’साठी तर ३ कोटी ९८ लाख रुपये ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’साठी दिले आहेत. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामालाही प्राधान्य दिले जाणार आहे.

जिल्हानिहाय वितरीत निधी (कोटीमध्ये) ः

सांगली ः ११, नाशिक ः ४, कोल्हापूर ः ३५ लाख, जालना ः  ६.५६, औरंगाबाद ः १३.६८, नगर ः ७.९८, धुळे ः ३.३३, नागपूर ः ४.६०, लातूर ः ४.३३, उस्मानाबाद ः २५.२०, अमरावती ः ६.९६, अकोला ः ४.९०, यवतमाळ ः ९, चंद्रपूर ः ३.४१, गडचिरोली ः ३.८१, भंडारा ः २.३२, पुणे ः १०.६२, सातारा ः २६.४४, नंदुरबार ः २.९९, जळगाव ः ४.६०, ठाणे ः ५५ लाख, पालघर ः १.५०, रायगड ः २.९०, गोंदिया ः २.७१, बीड ः ५, हिंगोली ः २.७९, वर्धा ः ५.२७, वाशीम ः ८.८०, नांदेड ः ४.२४, परभणी ः १२.९१, सोलापूर ः ४.६६, बुलडाणा ः ३३ लाख.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com