विदर्भात कृषी खात्यात ७० टक्‍के रिक्‍त पदे

विदर्भात कृषी खात्यात ७० टक्‍के रिक्‍त पदे
विदर्भात कृषी खात्यात ७० टक्‍के रिक्‍त पदे

नागपूर (प्रतिनिधी) ः या वर्षीच्या बदल्यांसाठी समुपदेशनाचा पॅटर्न कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. विदर्भात सद्यःस्थितीत ७० टक्‍के पदे रिक्‍त असून, बदली प्रक्रियेत ही पदे भरण्यासाठी विदर्भाला झुकते माप देण्याची गरज वरिष्ठ अधिकारी स्तरावरून व्यक्‍त होत आहे. 

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांची १६ पैकी १२ पदे रिक्‍त आहेत. कृषी विकास अधिकारी आणि त्यासोबतच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याचे पदही येथे रिक्‍त आहे. अमरावती जिल्ह्यात तालुका कृषी अधिकाऱ्याची १४ पैकी ११ पदे रिक्‍त आहेत. त्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या महत्त्वाच्या पदाचादेखील समावेश आहे. धारणी आणि चिखलदरा हे आदिवासी बहुल आणि दुर्गम तालुके आहेत. या भागात कुपोषणाची समस्या आहे. या ठिकाणची तालुका कृषी अधिकारी पदे गेल्या अनेक वर्षांत भरली गेली नाही. 

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर येथील पदे रिक्‍त आहेत. कृषी विकास अधिकाऱ्यांची वाशीम, बुलडाणा, यवतमाळ येथील पदे रिक्‍त आहेत. अधीक्षक कृषी अधिकारी (सामान्य) यातील पाचपैकी ३ पदे रिक्‍त आहेत. त्यासोबतच अधीक्षक कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) याची पाचपैकी तीन पदे रिक्‍त आहेत.

गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याची पाचही जिल्ह्यांत पदे रिक्‍त असून, कृषी अधिकाऱ्याची २४३ पैकी १०९ पदे रिक्‍त असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची १३ पैकी पाच पदे रिक्‍त आहेत. तंत्र अधिकाऱ्यांची ३८ पैकी १७ पदे रिक्‍त आहेत. नागपूर विभागातदेखील एकूण मंजूर पदाच्या ५५ टक्‍के पदे रिक्‍त असल्याचे सूत्र सांगतात. 

मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यांत अनुशेष विदर्भाच्या अनुशेषामागे या भागातील नेतृत्वाला संधी न मिळाल्याचे कारण पुढे केले जात होते. या वेळी मात्र मुख्यमंत्री, कृषिमंत्री, अर्थ, ऊर्जामंत्री अशी सारी महत्त्वाची पदे विदर्भाकडे असताना पदांचा अनुशेष दूर होऊ शकला नाही. त्यावरूनच या भागातील नेतृत्वच रिक्‍त पदांचा अनुशेष दूर करण्याबाबत उदासीन असल्याची चर्चा रंगली आहे. 

संवेदनशील यवतमाळातही रिक्त पदे यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या, फवारणीदरम्यान विषबाधेमुळे शेतकरी मृत्यूचेे प्रकार घडले. त्यामुळे या भागातील रिक्‍त पदे भरण्याची गरज होती. परंतु या जिल्ह्यात १६ पैकी १२ तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. कृषी विकास अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारीसुद्धा या जिल्ह्यात नाही. 

राज्याच्या तुलनेत निश्‍चितच विदर्भात रिक्‍त पदे अधिक आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या बदल्याच्या प्रक्रियेत विदर्भातील रिक्‍त पदे भरण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. - पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com