दलालांविरुद्ध कारवाईच धर्मा पाटील यांना श्रद्धांजली ः विखे पाटील

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : धुळे जिल्ह्यातील ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू आत्महत्या नसून, सरकारी दिरंगाईमुळे झालेली हत्या असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (ता. ६) केली. धर्मा पाटील यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर तेथील भूसंपादनात दलाली करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.

विखे पाटील यांनी नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांच्या आठवडा प्रस्तावाच्या भाषणाच्या सुरवातीलाच धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या इतिहासातील ही दुर्दैवी घटना असावी.

आत्महत्येच्या एक महिन्यापूर्वी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी महसूल मंत्री व धुळ्याच्या पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले होते. परंतु, सरकारने वेळीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

धर्मा पाटील दोन वर्षांपासून जमिनीच्या फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी वणवण भटकत होते; पण ते जिवंत असेपर्यंत सरकारने त्यांना दाद दिली नाही. त्यांच्या मृत्युनंतर मात्र काही तासांतच सरकारने फेरमूल्यांकनाचा निर्णय घेतला. याचाच अर्थ या सरकारने जाणूनबुजून धर्मा पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ३०२ चा गुन्हा का दाखल होऊ नये, असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com