लातूरमध्ये गारपिटीनंतर महिन्यातच शेतकऱ्यांना भरपाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीत शेतकऱ्यांच्या पीक व फळाचे नुकसान झाले. गारपिटीनंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने नुकसानीचे पंचनामे करून सरकारला अहवाल देऊन नुकसानभरपाईसाठी निधीची मागणी केली. प्रशासनाने मागणी केलेला सर्व निधी सरकारने मंजूर केला अन् गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत भरपाईच्या रकमेचे वाटपही झाले. गारपिटीनंतर महिन्यातच भरपाईची रक्कम हाती आल्याने शेतकरी सुखावले असून, शेतकऱ्यांना पहिल्यांदाच सरकारच्या गतिमान प्रशासनाचा प्रत्यय आला आहे.

जिल्ह्यातील दहापैकी सात तालुक्यांत ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपीट झाली होती. यात खरिपातील काही पिकांसोबत रब्बी पिकांना फटका बसला होता. उसासह आंबा व अन्य फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ५१ हजार २७० शेतकऱ्यांच्या वीस हजार ५४४ हेक्टवरील पिके तसेच फळपिकांना बाधा पोहाेचली होती. गारपिटीनंतर सरकारने लागलीच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देऊन दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीची भरपाई देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार प्रशासनातील गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे वेगाने पंचनामे करून अहवाल दिला होता.

जिल्हा पातळीवर अहवालाची माहिती एकत्र केल्यानंतर जिल्ह्यात १७ हजार १४६ हेक्टर जिरायत जमिनीवरील व दोन हजार ९७० हेक्टर बागायत जमिनीवरील पिकांचे तर ४२८ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याचे पुढे आले.

सरकारने जिरायत जमिनीवरील पिकांसाठी सहा हजार आठशे रुपये प्रतिहेक्टर, बागायत जमिनीवरील पिकांसाठी १३ हजार पाचशे रुपये प्रतिहेक्टर तर फळपिकांसाठी अठरा हजार रुपये प्रतिहेक्टर भरपाई मंजूर केली होती. त्यानुसार जिरायती पिकांच्या भरपाईसाठी ११ कोटी ६५ लाख ९१ हजार २३६ रुपये, बागायती पिकांसाठी चार कोटी ९८ हजार ९१५ तर फळबागांच्या भरपाईसाठी ७७ लाख तीन हजार शंभर रुपये अशी एकूण १६ कोटी ४३ लाख ९३ हजार रुपये निधीची मागणी प्रशासनाने सरकारकडे केली. ही मागणी सरकारने केवळ पंधरा दिवसांत मंजूर करून प्रशासनाला १५ मार्च रोजी निधीही उपलब्ध करून दिला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केला व बॅंकांनीही त्याचे वाटप सुरू केले.  

गारपिटीनंतर आदेश येताच नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडे भरपाईसाठी निधीची मागणी केली. पंधरा दिवसांतच निधी मंजूर होऊन उपलब्धही झाला. निधीचे तालुकानिहाय वाटप करून संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर भरपाईची रक्कम जमा केली. सद्यःस्थितीत भरपाईच्या बहुतांश रकमेचे वाटप शेतकऱ्यांना झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून योगदान दिले. सरकारकडूनही तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद मिळाल्याने गारपिटीनंतर केवळ एक महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती भरपाईची रक्कम देता आली. - डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी, लातूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com