'जलयुक्त'ची १६ हजारांवर कामे होऊनही मराठवाडा तहानलेलाच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : जलयुक्त शिवार योजनेमुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा सरकार करत असले तरी प्रत्यक्षात मराठवाडा अजूनही तहानलेलाच आहे. विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे १६ हजार २६९ कामे होऊनसुद्धा १९० गावे व १३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना व नांदेड या जिल्ह्यांमध्ये ७४ टँकर पाणीपुरवठा करत आहेत. 

औरंगाबादमध्ये २०१५-१६ मध्ये ८ हजार ८९८, २०१६-१७ मध्ये ५ हजार ८७७ तर २०१७-१८ मध्ये १ हजार ४९५ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करण्यात आली आहेत. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षांत ९ हजार ९७७ कामे झाली असताना तेथे ५५ टँकर धावत आहेत. राज्यात जलयुक्तची १६ हजार ५१२ गावांमध्ये ४ लाख ४० हजार ६० कामे झाली असताना सुमारे ५०२ गावे आणि ९० वाड्या तहानल्या आहेत. सुमारे ५०८ टँकर तेथे फेऱ्या मारत आहेत.

जलसंधारण विभागाचा जलयुक्तच्या कामांमुळे पाण्याची पातळी उंचावेल, असा दावा फोल ठरला आहे. मागील वर्षी याच दिवशी २९० गावे व ६२० वाड्यांना ३१४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. विशेष म्हणजे मराठवाड्याप्रमाणे अमरावती विभागाचीसुद्धा टँकरवरच भिस्त असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जलयुक्त शिवार अभियान राबवूनही शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल असून पिण्याच्या पाण्याअभावी ग्रामीण जनता त्रस्त आहे. 

अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे व मराठवाड्यातील मोठे, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा गेल्या वर्षीपेक्षा यंदा जादा आहे. तरीसुद्धा ग्रामीण भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना या धरणांमधील पाण्याला पिण्यासाठी प्राधान्य दिले जात नाही. इतर विभागांच्या तुलनेने मराठवाड्यामध्ये सर्वाधिक ३१६ टँकर सुरू आहेत. औरंगाबादमध्ये २३१ तर जालना ४४, परभणी ९, हिंगोली २ आणि नांदेडमध्ये ३० टँकर सुरू आहेत. बीड, उस्मानाबाद आणि लातूरकर यंदा सुःखी आहेत. या जिल्ह्यांमध्ये सध्या तरी टँकर सुरू नाहीत.

विदर्भातील अकोला, वाशीम, बुलडाणा व यवतमाळमध्ये १०२, उत्तर महाराष्ट्र ५९, तर कोकणामध्ये ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील १ गाव व १ वाडीला टँकरसेवा सुरू आहे.   

असे राबविले जलयुक्त अभियान  २०१५-१६   २०१६-१७ २०१७-१८ एकूण
निवडलेल्या गावांची संख्या ६२०२  ५२९० ५०२० १६५१२
एकूण कामे  २५४९९४ १७७०२१ ४४९३५ ४७६९५०
पूर्ण कामे      २५४२५९ १६३६४४   २२५५७  ४४०४६०
एकूण निधी (कोटी रुपये)  २००० २१७५  २५०  ४४२५
खर्च  १८५१  १४०२   ५१.२६   ३३०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com