कृषिसेवक परीक्षेतील जादा उमेदवारी रद्द

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : कृषिसेवकपदाच्या ऑनलाइन परीक्षेतील घोळ मिटविण्यासाठी आता एका उमेदवाराची केवळ एकच परीक्षा ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे जादा हॉलतिकिटे असली तर इतर विभागातील उमेदवारी रद्द केली जाणार आहे.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या अख्यत्यारीत १३, १४ व १५ मार्च रोजी राज्यात विविध विभागांमध्ये कृषिसेवकापदाच्या ९०३ जागांसाठी परीक्षा होणार आहे. राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलची मदत या परीक्षेसाठी घेतली जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यात हजारो विद्यार्थ्यांना एकापेक्षा जादा हॉलतिकिटे वाटली गेली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना दोन-तीन भागांमध्ये उमेदवारी मिळाली होती. 

एका विद्यार्थ्याने कोणत्याही एकाच विभागात परीक्षा देण्याचा नियम या भरतीत आहे. मात्र, तीन विभागांमध्ये अर्ज भरून एकापेक्षा जास्त हॉलतिकिटे काहींना वाटली गेली आहेत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी कृषी आयुक्तालयाकडे केली होती. ''नियमाला हरताळ फासून हजारो उमेदवारांना एकापेक्षा अधिक परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ एक हॉलतिकीटधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून ही चूक सुधारावी,'' अशी मागणी एक हॉलतिकीट असलेल्या विद्यार्थ्यांनी केली होती. 

कृषी आयुक्तालयाचे आस्थापना सहसंचालक सुधीन ननावरे यांनी हा घोळ महापरीक्षा कक्षाला कळविला होता. मात्र, त्याबाबत काय निर्णय झाला याची माहिती जाहीर केली जात नव्हती. मात्र, महापरीक्षा पोर्टलने आता याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "कृषिसेवक परीक्षा ठरलेल्या वेळेत आणि पारदर्शक होईल. विद्यार्थ्यांनी अजिबात चिंता करू नये. आम्ही एकाही उमेदवाराला जादा उमेदवारीची संधी देणार नाही. एका ठिकाणी परीक्षा दिली असल्यास प्रथम परीक्षा दिलेल्या विभागातील गुण ग्राह्य धरले जातील. इतर जादा ठिकाणी परीक्षा दिली तरी ती उमेदवारी रद्द समजली जाणार आहे, असा खुसाला राज्य शासनाने केलेला आहे. 

दुसरीकडे महापरीक्षा पोर्टलने विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या या निवेदनात व्याकरणाच्याही चुका निघाल्यामुळे विद्यार्थी अजून संतप्त झाले आहेत. या निवेदनात माहिती देताना ''परीक्षेला उपस्थित रहावे'' असे म्हणण्याऐवजी ''उपेक्षित रहावे'', असा शब्दप्रयोग केला गेला आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलने हा काय खेळ मांडला आहे, असा सवाल काही विद्यार्थ्यांनी केला आहे.  उमेदवारांकडून एकापेक्षा जास्त लॉगईन आयडी उघडले जाण्याची शक्यता असते. त्याला विविध कारणे असतात. मात्र, महापरीक्षेने वेळेत दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यभर संभ्रमाची स्थिती तयार झाली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

पोलिस भरतीत जादा उमेदवारी कशी काय चालते? एकापेक्षा जादा उमेदवारीस रद्दबातल ठरविल्यामुळे जादा अर्ज भरलेले विद्यार्थीही नाराज झाले आहेत. राज्य शासनाच्या पोलिस भरतीत जादा उमेदवारी चालते, मग कृषी विभागाने बंदी का घातली, असा सवाल विद्यार्थ्यांनी कृषी आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. एका उमेदवाराला दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही, असा राज्य शासनाचा कोणताही जीआर नाही, मग कृषी आयुक्तालयाने कशाचा आधारे जादा अर्ज भरणाऱ्या ७० टक्के विद्यार्थ्यांची संधी हिरावून घेतली, असाही जाब विद्यार्थी विचारत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com