शेकटा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केंद्रीय पथकाचे श्री. अश्वनी कुमार, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरूषोत्तम भापकर, व कृषी आयुक्‍त डॉ. एस. पी. सिंह.
शेकटा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केंद्रीय पथकाचे श्री. अश्वनी कुमार, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरूषोत्तम भापकर, व कृषी आयुक्‍त डॉ. एस. पी. सिंह.

केंद्राचे पथक शेतकऱ्यांच्या दारी; तक्रारींचा पाऊस (Video सुद्धा)

औरंगाबाद  ः प्राप्त ज्ञापनाच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झालेल्या केंद्राच्या पथकाचा विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यातील दौरा बुधवारपासून (ता. १६) सुरू झाला. पहिल्याच दिवशी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद, इतर प्रमुख पिकांचीही परिस्थिती व कृषी विभागाकडून योजना, उपाययोजना, अंमलबजावणी याविषयीच्या कृतीची माहिती जाणून घेण्याचे काम पथकाच्या सदस्यांनी केले.  

औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव व शेकटा या दोन गावांना पथकाने भेटी दिल्या. गाढेजळगाव येथील ग्रामसंसद भवनमध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांशी पथक प्रमुख श्री. अश्वनी कुमार जॉईंट सेक्रेटरी (सीड्‌स) व त्यांचे केंद्रीय पथकातील सदस्य सेंट्रल वॉटर कमीशनचे आर. डी. देशपांडे, डॉ. के. डब्ल्यु देशकर, श्रीमती चाहत सिंह, श्री.  एम.जी. टेंबुर्णे, श्री. नगराळे आदींनी संवाद साधला. कृषी आयुक्‍त एस.पी. सिंह व विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर या पथकासमवेत होते. 

शेतकरी आणि केंद्रीय पथकातील संवाद गाढेजळगाव येथे शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य सय्यद जाबेर यांनी त्यांचे कपाशीचे क्षेत्र, खर्च, उत्पादन व उत्पन्नाचे कोलमडलेल्या गणिताची मांडणी पथकासमोर केली. दरम्यान गाढेजळगाव येथे दिलेल्या माहितीत कपाशी क्षेत्रासंबंधीच्या आकडेवर उत्तर देताना कृषी विभागाची धंदल उडाली होती. लागवड झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत पंचनाम्याअंती क्षेत्र वाढले कसे असा तो प्रश्न होता. त्यावर पथकाचे समाधान करताना कृषी विभागाची चांगलीच धांदल उडाली होती. 

दरम्यान यापुढे बोंड अळीचे संकट येणार नाही याविषयी पावले उचलण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज पथकाने व्यक्‍त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास फुलंब्री तालुक्‍यातील डोंगरगाव कवाड येथील कापूस व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पथक जालना जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाले. 

असे होते पथकाच्या प्रश्नांचे स्वरूप नुकसानीची पातळी नेमकी किती, किती खर्च, फवारण्या किती केल्या, उपाययोजनांची माहिती नेमकी कोणी दिली, कीडनाशके कोणती वापरली, कुणी सांगितलेली कीडनाशके फवारली, विकलेल्या मालाला दर काय मिळाला, विमा उतरविला होता काय, त्याचा परतावा मिळाला का, कोणत्या कंपन्यांचे बियाणे वापरले, रेफ्युजी बियाणे लावले होते का, कशा पद्धतीने त्याची लागवड केली, उपाययोजना केल्यानंतरही काय परिणाम दिसून आला, एकरी उत्पादन नेमके किती आले, गतवर्षी किती आले होते, बागायती व कोरडवाहू खर्चाचे व उत्पादन उत्पन्नाचे गणित नेमके काय आदी प्रश्न पथकाने थेट शेतकऱ्यांना विचारले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com