केंद्रीय पथक आजपासून मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : खरीप हंगामात कापूस, धान पिकांचे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णय शासनाने १७ मार्च २०१८ च्या निर्णयान्वये घेतला आहे. त्या अनुषंगाने बुधवारपासून (ता. १६) दोन दिवस केंद्राचे पथक केंद्र शासनास पाठविलेल्या ज्ञापनाच्या अनुषंगाने मराठवाडा आणि विदर्भात पाहणी करणार आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतकरी पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीला गत हंगामात गुलाबी बोंड अळीने संपविले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कपाशीच्या झालेल्या नुकसानीपोटी १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित आहे. त्यामधील पहिला हप्ता म्हणून ४०७ कोटी १ लाख रुपये रक्‍कम मंजूर करण्यात आली, तर पहिल्या हप्त्यापैकी बीम्स प्रणालीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना ३२५ कोटी ६० लाख रुपयांची रक्‍कम वितरित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली. 

यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठीचे ७९ कोटी, बीडसाठीचे ६८ कोटी ४२ लाख, जालना जिल्ह्यासाठी ७३ कोटी ४३ लाख, नांदेड जिल्ह्यासाठीचे ४६ कोटी ९७ लाख रुपये, लातूरसाठी २ कोटी ३० लाख, परभणीसाठीचे ४२ कोटी १२ लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यात ९ कोटी ७६ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठीच्या ३ कोटी ६० रुपये निधीचा समावेश आहे.

शासनाच्या निर्णयानंतर कापूस व धान पिकाच्या नुकसानीसाठी केंद्र शासनास पाठविलेल्या ज्ञापनाच्या अनुषंगाने केंद्राचे पथक १६ व १७ मे दरम्यान राज्यातील औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागाच्या पाहणी दौऱ्यावर येणार आहे.  केंद्राचे पथक १६ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव, शेकटा या दोन गावांना भेट दिल्यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यानंतर डोंगरगाव कवाड गावाला भेट व तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पथक जालना जिल्ह्याकडे रवाना होईल. त्यामध्ये भोकरदन तालुक्‍यांतर्गत बाभूळगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनतर सिपोरा बाजार व जाफ्राबाद तालुक्‍यातील बोरगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून जालन्यात पथक जिल्हाधिकारी जालना यांच्याशी संवाद साधेल. 

बुलडाणा जिल्ह्यातील भविगाव (ता. देऊळगाव राजा, उंद्री (ता. चिखली), अकोला जिल्ह्यातील रिधोरा, अकोला, बोरगाव मंजू, अंभोरा, अमरावती जिल्ह्यातील शिवनगाव (ता. तिवसा) आदी ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद तसेच अकोला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पथक नागपुरात दाखल दाखल होईल. १८ मेला नागपूरवरून मुंबईत दाखल झाल्यानंतर पथक पुन्हा दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरिपाची पिके काढून टाकल्यानंतर रब्बीचीही पिके आता शिल्लक राहिलेली नाहीत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करेल, असा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com