दूध भुकटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले नाही : राजू शेट्टी

दूध भुकटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले नाही : राजू शेट्टी
दूध भुकटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले नाही : राजू शेट्टी

देशात दुधाचा ओघ वाढ आहे. इतरवेळी जेवढी मागणी तेवढाच पुरवठा होतो; पण सध्या सगळीकडूनच दुधाचा ओघ वाढला आहे. सध्या दुध भुकटीचे दर पडलेले आहेत. यामुळे स्टॉक तसाच शिल्लक राहिलेला आहे. यामुळे दुधापासून भुकटी तयार करणे हे परवडणारे नाही. चार महिन्यांपूर्वी आम्ही पश्‍चिम महाराष्ट्रातील नामवंत सहकारी खासगी दूध संघाच्या प्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्यांना याची कल्पना दिली होती. तुम्ही केंद्राकडे जा आणि केंद्राला साकडे घालून सध्या स्टॉकला असणारी दूध भुकटी आणि लोणी देशाबाहेर घालवा अशी विनंती आम्ही दूध संघांच्या मार्फत केली होती; अन्यथा जादा दुधापासून तयार होणारी दूध भुकटी काय करायची असा प्रश्‍न निर्माण होईल, अशी भीतीही व्यक्त केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नाही.

निर्यातीबाबतचे सगळे अधिकार केंद्रीय स्तरावरून होणे अपेक्षित असते. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज असते. सध्या आंतराष्ट्रीय बाजारातही भुकटीचे दर कमी आहेत. परिणामी निर्यात परवडत नाही. यासाठी केंद्रानेही अनुदान देणे गरजेचे आहे; पण असे काही झाले नाही. यामुळे भुकटीचा प्रश्‍न तसाच पडून राहिला. दुसरा एक पर्याय पण आम्ही सुचविला होता. जागतिक स्तरावरून गरीब राष्ट्रांना मदत करणे सुरू असते. अनेकदा आपण रोख स्वरूपात मदत देत असतो. याऐवजी भुकटी, लोणी, साखर यांसारख्या वस्तूंच्या स्वरूपात जर मदत दिली तर त्याचा फायदा दोघांनाही होऊ शकेल.

यासाठी केंद्राला साकडे घाला अशी विनंतीही राज्य सरकारकडे केली होती. पण काहीच घडले नाही. भुकटीचा स्टॉक पडून असल्याने त्याचा दबाव दुग्ध व्यवसाय करणाऱ्या संघावर आला. जी भुकटी २४० रुपये इतकी होती. त्याची किंमत १४० रुपये इतकी झाली. यामुळे भुकटी करणे परवडत नाही. एवढ्या किमतीत भुकटी द्यायची तर दूध दर फक्त १७ ते १८ रुपये इतकाच द्यायला हवा. पण तितका दूध दर उत्पादकाला परवडत नाही. ही समस्या आहे. भुकटीला तीन रुपये अनुदान दिले आणि २३ रुपयांनी दूध घेतले तर १८० रुपयांना दूध भुकटी पडते.

दूध भुकटीला सबसिडी सुरू झाली; परंतु खासगी दूध संघांनी, भुकटी कंपन्यांनी दुधाच्या खरेदी दरात वाढ केली नाही. यामुळे उत्पादकांना काहीच फायदा झाला नाही. आमच्या स्वाभिमानी दूध कंपनीचे उदाहरण घ्यायचे झाले तर रोज दोन टॅंकर गायीचे दूध शिल्लक राहाते. आम्ही २५ ते २६ रुपयांनी दूध घेतो. तर भुकटीवाले २२ ते २३ रुपयांनी दूध मागत आहेत. हे पाहून आम्ही भुकटी कंपन्यांशी संपर्क साधून आम्हाला तुम्ही भुकटी करून द्या आणि शासनाचे अनुदान घ्या असे सांगितले. याशिवाय लिटरला ५० पैसे आम्ही देतो त्याची विक्री कशी व कोठे करायची हे आम्ही पाहातो, असेही सांगितले; परंतु कंपन्यांनी याला नकार दिला. अशी सध्याची परिस्थिती आहे.

दर नसल्याने उत्पादक तर तोट्यात जात आहेच; परंतु शासनाचे अनुदानही संबधितांना मिळण्याऐवजी अन्य लोकांना मिळत आहे. परिणामी काही निर्णय घेऊनही शासनाला हा व्यवसाय सुधारण्यासाठी फार यश आले आहे असे वाटत नाही. सरकारने परिस्थिती गांभीर्याने समजावून घेऊन तातडीने आणि ठोस उपाय करायला हवेत.   -  राजू शेट्टी,   खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com