‘कृषी ताई’ची संकल्पना आता ग्रामस्तरावर

‘कृषी ताई’ची संकल्पना आता ग्रामस्तरावर

औरंगाबाद : मराठवाडा व विदर्भातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता ग्रामस्तरावर ‘कृषी ताई’ची संकल्पना राबविली जाणार आहे. आतापर्यंत १०३ गावांत कृषी ताईंची निवड करण्यात आली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मराठवाड्यातील पंधरा जिल्ह्यात राबविल्या जात आहे. येत्या सहा वर्षांत या प्रकल्पाच्या टप्प्यात ५ हजार १४२ गावांमधील १७ लाख शेतकरी व जवळपास ३० लाख हेक्‍टर क्षेत्र येणार आहे. जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १०५० गावांमध्ये कृषी संजीवनी प्रकल्प येत्या खरीप हंगामापासून राबविल्या जाणार आहे. त्यासाठी जवळपास ३०० कोटीचा निधी चालू आर्थिक वर्षात उपलबध करून दिला जाणार आहे. 

या प्रकल्पात महिला शेतकऱ्यांवर विशेष फोकस राहणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यापासून प्रगतिशील महिला शेतकऱ्यांना ‘कृषी ताई’ म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे. या कृषी ताईची महिला आमसभेतून निवड केली जाणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रत्येक गावांमध्ये महिला शेतकऱ्यांची आमसभा घेतली जावी, त्या आमसभेत होणारे प्रत्येक निर्णय त्या सभेच्या प्रोसेडींगवर घेतले जावे, त्या प्रोसेडिंगवरील विषय ग्रामसभेमध्ये मांडून त्यामधील किती विषय ग्रामसभा मान्यता देते यासह इतरही सविस्तर नोंदी घेणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घेणे संबंधित यंत्रणेला आवश्‍यक करण्यात आले आहे.

एकूणच ग्रामविकासाच्या कार्यात महिलांचा प्रत्यक्ष सहभाग वृद्‌धींगत करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com