यावल, जि. जळगाव : शहर व परिसरात या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी, मका, कापूस व केळी पिकांचे सुमारे सव्वा कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वादळामुळे घरांवरील पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दोन कच्ची घरे जमीनदोस्त झाली. फैजपूर रस्त्यावर वृक्ष कोसळून दोन मोटार सायकली त्याखाली दबल्या गेल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहर व परिसरात वादळामुळे वीज वितरण कंपनीच्या ४०ते ५० ठिकाणी वीजतारा तुटून पडल्या. २० ते २२ खांब वाकले तर पाच खांब पूर्णतः मोडले गेले. यामुळे वीज वितरण कंपनीचे सुमारे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले. कोसळलेले वीज खांब, व तुटलेल्या विजतारा पूर्ववत जोडणीसाठी शहर कार्यालयाव्यतिरिक्त नजीकच्या कार्यालयातून वायरमन आले होते.
दरम्यान पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे तलाठी व कृषी विभागास पंचनामे करण्यात अडचणी येत आहे. वादळाचा सर्वाधिक तडाखा यावलसह परिसरात व सातोद-वड्री रोडवर बसला. यावलसह नजीकच्या पाच गावांतील ४५ शेतकऱ्यांचे ९०० हेक्टरवरील केळी, कापूस, मका, ज्वारी या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, सुमारे सव्वा कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तलाठी व कृषी विभागाचे अधिकारी नुकसानाच्या पंचनाम्यासाठी शेतांमध्ये गेले असताना प्रत्येक शेतात गारा असल्यामुळे त्यांचे फार हाल झाले.