जळगाव ः जिल्ह्यात पूर्वहंगामी (बागायती) व कोरडवाहू तुरीवर मर रोगाचा काहीसा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात पीक हळूहळू पिवळे होऊन पुरते जमीनदोस्त होत आहे. मर रोगामुळे काळ्या कसदार जमिनीसह हलक्या व मुरमाड जमिनीतील पीक बाधित होत आहे. यात अनेक ठिकाणी नुकसानाची पातळी हजार झाडांमागे ६० ते ७० झाडे एवढी आढळून आली आहे.
जिल्ह्यात यंदा तुरीची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. त्यात सर्वाधिक लागवड मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, जामनेर व पाचोरा तालुक्यांत आहे. चोपडा, जळगाव, अमळनेरमधील तापी काठावरील अनेक गावांमध्येही बऱ्यापैकी लागवड झाली आहे.
जिल्हाभरात जवळपास अडीच हजार हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती तूर आहे. पूर्वहंगामी तूर सद्यःस्थितीला फुलोऱ्यावर आली आहे. यातच पूर्वहंगामी तुरीमध्येच मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव कसा रोखावा, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मरग्रस्त झाडे पिवळी होऊन नंतर पूर्णतः वाळतात. ही झाडे उपटून फेकण्याशिवाय कोणताही पर्याय शेतकऱ्यांसमोर नसल्याची स्थिती आहे. यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकरी एक क्विंटलपर्यंतचे नुकसान आजच सहन करण्याची वेळ मर रोगामुळे आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.