विचार पटला, दुष्काळ हटला...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे ः गावातील पाणीटंचाई दूर करण्याची ताकद प्रत्येकाच्या मनगटात आहे, त्यासाठी हवी इच्छेची वज्रमूठ, याची जाणीव ‘सकाळ माध्यम समूहा’ने गावागावांत निर्माण केली. त्याच्या जोडीला ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून दोन लाख रुपयांचा मदतनिधीही दिला. त्यासाठी लोकसहभाग, नियोजनपूर्वक आणि सूत्रबद्ध कामाची अट घातली. गावकरी हिरीरीने कामाला लागले. सपाट मैदान असलेले ओढे, नाले, नद्या यांचे खोलीकरण केले. पावसाळ्यात त्या ठिकाणी साठलेले पाणी बघून गावकऱ्यांचे डोळे आनंदाने पाणावले. अनेक गावांनी हा जलमंत्र जोपासत भविष्यात केलेल्या वाटचालीने त्यांची जलसमृद्धीकडे वाटचाल सुरू झाली.

‘सकाळ’ने २०१३ मध्ये पन्नास गावांमध्ये जलसंधारणाचे काम प्रथम सुरू केले. ओढे, नाले, नदी, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी यांसारख्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण त्याद्वारे केले.

‘सकाळ माध्यम समूहा’ने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी जलसंधारणाची चळवळ सुरू केली. राज्यातील पाचशेच्यावर गावांमध्ये जलसंधारणाची भरीव कामे झाली. या गावांमध्ये सहाशे कोटी लिटरहून अधिक पाणीसाठा झाला. ‘सकाळ’च्या आर्थिक मदतीतून कामाची सुरवात झाल्यानंतर तन, मन, धनपूर्वक वाढलेल्या लोकसहभागाने जलक्रांती साधली. जलसंधारणाचा ‘सकाळ’चा विचार गावकऱ्यांना पटला अन्‌ वर्षानुवर्षांचा दुष्काळ हटला. गावांचे सामाजिक, आर्थिक जीवनमान उंचावले.  

‘मावडी-सुपे’ने दाखविला समृद्धीचा मार्ग पुरंदर तालुक्‍यातील मावडी-सुपे गावातील ओढ्यावर ‘सकाळ’च्या मदतीतून पहिला बंधारा बांधला. त्यानंतर गावात आजमितीला सोळा बंधारे झाले आणि त्याने जलसमृद्धी आली. अशा गावांमध्ये एक कोटी लिटरपासून ते ४५ कोटी लिटरपर्यंत जलसाठा झाला. जलसंधारणाच्या अभियानाला एकीचे बळ, गावकऱ्यांची इच्छाशक्ती आणि कृतिशीलतेची जोड मिळाल्याने ही चळवळ गावात कायमस्वरूपी विस्तारत राहिली. विहिरींना पाणी राहिल्याने बागायतीचे क्षेत्रही विस्तारले. 

खोलीकरण, गाळ काढणे, रुंदीकरण, सरळीकरण, पंप आणि बंधारा दुरुस्ती, बंधारे बांधणे इत्यादी कामे ‘सकाळ माध्यम समूहा’ने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून हाती घेतली. ग्रामसभेच्या पूर्वसंध्येला गावातील महिलांच्या सभेत तनिष्का सदस्यांनी जलसंधारणाचा विषय मांडून पाणीप्रश्‍नावर चर्चा घडवली. दुसऱ्या दिवशीच्या ग्रामसभेत गावकारभाऱ्यांनी, ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दिला. ग्रामसभेत ठराव झाले.

सकाळची मदत, मार्गदर्शन घेण्याचे ठरले. अशा पद्धतीने जलसंधारणाच्या कामात पुढे येणाऱ्या प्रत्येक गावाला ‘सकाळ रिलीफ फंडा’ने दोन लाखांची मदत दिली. गावकऱ्यांनी तेवढाच वाटा; तर काही ठिकाणी तर ‘सकाळ’च्या दोन लाखांत गावकऱ्यांनी दहा लाखांपर्यंत स्वतःची रक्कम जमा केली. श्रमदान झाले. कोणी जेसीबी मोफत दिले, तर कोणी काम करणाऱ्यांच्या चहापान-भोजनाची व्यवस्था केली. सारा गाव झपाटून जलसंधारणात गुंतून गेला. निर्धारित वेळेत काम झाल्याने पावसाळ्यात बहुतांश गावांतील जलस्त्रोतांमध्ये पुरेसा साठा झाला. गावकऱ्यांचा उत्साह दुणावला. काही गावांनी त्यानंतर अनेक संस्था-संघटनांच्या मदतीने साखळी बंधाऱ्यांची संख्या वाढविली.

जमीनही बनली सुपीक जलसंधारणाच्या कामातून नद्या, ओढा, नाल्यातून निघालेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नेला. त्यांनी तो मुरमाड, पडीक जमिनीत टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढली. वहिवाटी खालील जमिनीचे प्रमाण वाढले.

घडले सुखद बदल जलसंधारणाचे काम करताना ओढ्यांवर अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, या कामात सारा गाव जुंपल्याने ही अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून घेतली अन्‌ ओढ्या-नाल्याचे क्षेत्र मोकळे झाले. यानिमित्ताने काही ठिकाणचे वर्षानुवर्षांचे हद्दीचे तंटेही निकाली निघाले.

अबब! किती मोठे काम ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करीत असताना पारदर्शकता, परिणामकारक कार्यपद्धती यांचा अवलंब केला जातो. सरकारी यंत्रणेकडून कामाच्या अंदाजपत्रकाची खातरजमा केली जाते आणि प्रत्यक्षात काम झाल्यानंतर ते तेवढ्या रकमेचे आणि त्या आकाराचे झाले की नाही, हे तपासून घेतले जाते. अनेकदा, दिलेल्या रकमेच्या दुप्पट किंवा त्याहून अधिक काम यातून झाल्याचे निदर्शनाला येते. याला जबाबदार असतो तो लोकसहभाग आणि गावकऱ्यांचा उत्साह. त्यांच्या सहभागाने मोठे काम कमी खर्चात उभे राहिल्याचे निदर्शनाला आले आहे.

समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करून बदल घडवून आणणे, ही ‘सकाळ’ची भूमिका कायम राहिली आहे. महिलांचे तनिष्का व्यासपीठ, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘यिन’ संघटन ही त्याची प्रतीके आहेत. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या मदतीने आणि या व्यासपीठांच्या माध्यमातून पाच वर्षांत राज्यात जलसंधारणाचे मोठे काम झाले. अनेक गावे टंचाईमुक्त झाली. ‘लोकांनीच करायचा लोकांचा उद्धार’ ही संकल्पना जलसंधारणात राबविली गेली. त्याला मोठे यश आले.  - प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com