अवकाळी पावसामुळे हळदीसह रब्बी पिकांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रविवारी (ता. ११) रात्री झालेल्या वादळी वारे आणि विजांच्या कडकडात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणी सुरू असलेल्या हळदीचे ओले कंद, रब्बी पिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

रविवारी (ता. ११) सकाळी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायकांळी साडेसहा नंतर वसमत तालुक्यातील अनेक गावशिवारात अर्धा ते एक तासभर जोरदार पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, लोहा तालुक्यांतील अनेक गावाशिवारातील पिकांना वादळी वारे पावसाने तडाखा दिला. 

परभणी जिल्ह्यतील पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांत हळद काढणी हंगाम सुरू झाला आहे. काढणी सुरू असताना हळदीचे कंद तुटतात. ते पावसात भिजल्यामुळे सडून नुकसान होणार आहे. गहू, ज्वारी, हरभरा, करडईचे खळे सुरू आहेत. पावसात भिजल्यामुळे दाण्याची प्रत खराब होणार आहे. रात्री अचानक पाऊस आल्यामुळे शेतामध्ये कापणी केलेला तसेच खळ्यावरील झाकता न आलेली पिके भिजली आहेत. त्यामुळे कमी बाजारभाव मिळून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक आडवे झाल्यामुळे कणसातील दाण्यासह कडब्याच्या प्रतीवर परिणाम होणार आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा, संत्रा, मोसंबी आदी फळपिकांसह टोमॅटो, कोबी आदी भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस आल्यामुळे हळदीचे ओले कंद भिजले आहेत. त्यामध्ये बुरशीची वाढ होऊन ते सडतात. यामुळे उत्पादनात घट येते असे तेलगांव येथील शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com