शेतकऱ्यांनी बँकांच्या कर्जाची माहिती अपडेट करणे आवश्यक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती आॅनलाइन अर्जामध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा अपूर्ण माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदानासाठी तात्पुरते अपात्र ठरविले जाणार आहेत.

कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी अर्जदारांच्या पोर्टलवरील यादीच्या छापिल प्रती काढून गावागावातून चावडीवाचन केले जाणार आहे.दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (ता. २२)पर्यंतची अंतिम मुदत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्रांवर जाऊन आॅनलाइन अर्जामध्ये दुरुस्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

शेतीसाठी कर्ज घेत असताना काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंका किंवा ग्रामीण बँक, सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. परंतु ऑनलाइन अर्ज भरताना केवळ एकाच बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. या शेतकऱ्यांनी दोन्ही बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख त्यांच्या अर्जात करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या माहितीचे एकत्रीकरण वरिष्ठ पातळीवर संगणकाद्वारे होणार आहे. परंतु काही शेतकरी सभासदांनी अपूर्ण माहिती दिली असल्यामुळे त्यांचे कर्जमाफीचे किंवा प्रोत्साहनपर अनुदानाचे अर्ज तात्पुरते अपात्र ठरविले जाणार आहेत.

त्यामुळे एकापेक्षा जास्त बॅंकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती ऑनलाइन अर्जात नमूद करावी. कर्जखाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेस तसेच गटसचिवाकडे आधार कार्डची प्रत द्यावी. यामुळे कर्जमाफी योजनेतील लाभापासून ते अपात्र ठरणार नाहीत.

तांत्रिक किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एकही शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षेतेखाली तालुका स्तरावर समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी या समितीला सहकार्य करणे आवश्यक आहे.

कर्जमाफी योजनेतील अर्जदारांची पोर्टलवरील यादी प्रिंट काढल्यानंतर तिचे गावपातळीवर चावडी वाचन करून पात्र लाभार्थींची शहानिशा करण्यासाठी प्राथमिक पडताळणी केली जाणार आहे.  तसेच कर्जमाफीस पात्र होण्यासाठी आधार कार्ड आणि केवायसी कागदपत्रे बॅंकेकडे देणे आवश्यक आहे.

जिल्हा बँकेशिवाय इतर बँकांकडून कर्ज घेतले असले, तरी एकूण १ लाख ५०  हजार रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com