राहुरी कृषी विद्यापीठात खरीप कांदा बियाण्यांसाठी झुंबड

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेली गर्दी. (छायाचित्र : रहिमान शेख)
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेली गर्दी. (छायाचित्र : रहिमान शेख)

राहुरी विद्यापीठ, जि. नगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कांदा पिकाचे पावसाळी खरीप वाण बसवंत-७८० व फुले समर्थ हे बियाणे शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाण्यांसाठी नाशिक, धुळे, पुणे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, काही शेतकरी आदल्या दिवशीपासूनच मुक्कामी आहेत.  

प्रत्येक शेतकऱ्यास ५ किलो बियाणे देण्यात येत असून, ९०० रुपये प्रतिकिलो बियाणे हा विद्यापीठाचा दर आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या बियाण्यांकडे पाठ फिरविली होती. मात्र या वर्षी शेतकऱ्यांची गर्दी विद्यापीठास दिलासा देणारी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्राबरोबरच पुणे-नगर रस्त्यावरील चास येथील संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, उद्यान विद्या महाविद्यालय, धुळे, पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्र; तसेच जळगाव येथील संशोधन केंद्रांवरही कांद्याच्या या बियाण्यांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मधुकर धोंडे यांनी दिली. 

एकूण १२ टन कांदा बियाण्यांची विक्री पहिल्या टप्प्यात सुरू केली असून, राहुरी येथे ४८४३ किलो फुले समर्थचे सत्यप्रत बियाणे व २०३९ किलो फुले बसवंत ७८०च्या बियाण्यांची पहिल्या टप्प्यातील विक्री आजपासून सुरू करण्यात आली. विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी गर्दीचे चोख नियोजन केले होते. मात्र पोलिस संरक्षण वेळेत न मिळाल्याने विद्यापीठाचे नियोजन कोलमडले. शेतकऱ्यांनी विक्री केंद्राचे गेट तोडून विक्री केंद्रांच्या रांगांवर धाव घेतली. यादरम्यान सुरक्षारक्षक दत्तू जाधव जखमी झाले. 

बियाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याचे विद्यापीठाचे अधिकारी वारंवार शेतकऱ्यांना सांगत असतानादेखील शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. विक्रीदरम्यान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी पाहणी केली. बियाणे विभागाचे डॉ. शरद गडाख, डॉ. चंद्रकांत साळुंके, डॉ. केशव कदम, डॉ. मधुकर भालेकर, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी विक्रीचे नियोजन केले. 

विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी काहीही सुविधा केल्या नाहीत, आम्ही रात्रीपासून येथेच थांबून होतो, सकाळी ९ वाजता अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर उन्हामध्ये कांदा बियाण्यांची विक्री सुरू करण्यात आली. सकाळी आलेल्या शेतकऱ्यांनी सर्व गोंधळ करून व पोलिसांनी आम्हास पुन्हा रांगेत येण्यासाठी बजावले, विद्यापीठाने टोकण व्यवस्था केली असती, तर इतक्‍या मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडालाच नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com