जळगाव : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा झाला. पण गरजेच्या वेळी पाऊस न आल्याने खतांची उचल झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात विविध गोदामे, दुकाने आदी ठिकाणी मिळून जवळपास ३५ ते ४० हजार मेट्रिक टन खते पडून आहेत, असा अंदाज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्हा खतांच्या वापरामध्ये आघाडीवर आहे. खरिपात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गरज जिल्ह्यात असते, त्यामुळे मागणीदेखील अधिक करावी लागते. त्या दृष्टिने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली. जशी मागणी नोंदविली, तसा लक्ष्यांकही मंजूर झाला, परंतु जून ते ऑगस्ट या खरिपातील पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने खतांची हवी तशी उचल झाली नाही.
जिल्ह्यात दर महिन्याला खतांचा सुरळीत व हवा तेवढा किंवा लक्ष्यांकानुसार पुरवठा खत कंपन्यांनी केला. पण मागणीअभावी खते पडून आहेत. जिल्ह्यात युरिया, संयुक्त खते, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश अशी सर्वच खते कमी अधिक प्रमाणात पडून आहेत. डीएपी अधिक प्रमाणात पडून असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे मिळाली.
जिल्ह्यात युरियाची गरज दरवर्षी अधिक असते. त्यामुळे युरियाची दीड लाख मेट्रिक टन एवढी मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत एक लाख आठ हजार मेट्रिक टन एवढ्या युरियाचा पुरवठा झाला आहे. त्याची उचल जुलैच्या सुरवीताला व ऑगस्टमध्ये झाली. परंतु, सद्यःस्थितीत केवळ केळी पट्टयात युरियाची मागणी असल्याचे सांगण्यात आले. जी शिल्लक खते आहे, ती परत जाणार नाहीत. त्यांचा वापर रब्बी हंगामासाठी केला जाईल. त्यासंदर्भातील नोंदी कृषी विभागातर्फे घेतल्या जात आहेत. नेमकी कुठली खते किती पडून आहेत किंवा त्यांची विक्री झालेली नाही, याची माहिती संकलित करण्याची कार्यवाही कृषी विभाग करीत आहे.