पावसामुळे कोल्हापूरातील गूळ हंगाम लांबणीवर

दररोज पाऊस पडत असल्याने जळण ओले होण्याची शक्‍यता असल्याने बहुतांशी गुऱ्हाळमालकांनी गुऱ्हाळ सुरू करण्याचे धाडस केले नाही.
गुऱ्हाळ
गुऱ्हाळ

कोल्हापूर : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पडणाऱ्या जोरदार पावसामुळे गूळ हंगामा लांबण्याची शक्‍यता आहे. दररोजच्या पावसाने गुऱ्हाळ सुरू करण्यबाबत कोणतीच हालचाल करता येत नसल्याने गुऱ्हाळघरमालक पावसाच्या उघडिपीच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज पाऊस पडत असल्याने जळण ओले होण्याची शक्‍यता असल्याने बहुतांशी गुऱ्हाळमालकांनी गुऱ्हाळ सुरू करण्याचे धाडस केले नाही.  जिल्ह्याचा गूळ हंगाम तोंडावर आला आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील अनेक गूळ उत्पादक शेतकरी गुऱ्हाळ सुरू करतात. मुहूर्ताच्या सौद्याला दरही चांगले मिळत असल्याने गूळ लवकरात लवकर तयार करून बाजारपेठेत पाठविण्याचा प्रयत्न असतो. गणेशोत्वसव झाला की गुऱ्हाळघरांची तयारीही वेगात सुरू होते. पंधरवड्यापूर्वी काही दिवस वातावरण चांगले होते. पाऊस नसल्याने गूळ उत्पाकांनी गुऱ्हाळ सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली होती. परंतु दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाने या तयारीला ब्रेक लावला आहे. दिवसभर कडक ऊन जरी असले, तरी एक दोन तास मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वच शेतकामे करणे अडचणीचे झाले आहे. याचा फटका गूळ उद्योगालाही बसत असलचे गूळ उद्योगातील सूत्रांनी सांगितले.  गुऱ्हाळ सुरू करण्यासाठी शक्‍यतो कोरडे हवामान लागते. उसाची वाहतूक, जळणाची सुरक्षितता व तयार झालेल्या गुळासाठी हे हवामान चांगले असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून संततधार नसला, तरी दररोज काही काळ तरी जोरदार पाऊस होत असल्याने यामुळे गुऱ्हाळघराची यंत्रणाच ठप्प झाली आहे. जोपर्यंत सलगपणे कडक ऊन पडणार नाही तोपर्यंत गुऱ्हाळघरे सुरू करणे अशक्‍य असल्याचे गुऱ्हाळघरचालकांनी सांगितले. कामगारांची जुळवाजुळव झाली असली, तरी पाऊस थांबल्याशिवाय काहीच करू शकत नसल्याने कामगारांनाही अद्याप बोलावले नसल्याचे गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यातच वाफसाही नसल्याने उसाची वाहतूक करणेही अडचणीचे झाले असल्याने काही दिवस तरी गूळनिर्मिती करणे अशक्‍य असल्याचा अंदाज गूळ उद्योगातून व्यक्त होत आहे.  बाजार समितीतही आवक नाही  येथील बाजार समितीत या परिसरातून गुळाची आवकही जवळ जवळ थांबल्याचे बाजार समितीचे सचिव दिलीप राऊत यांनी सांगितले. कर्नाटकातून सप्ताहातून एक ते दोन दिवस गुळाची आवक होत आहे. त्याचाच सौदा काढण्यात येत आहे. अजून कोल्हापूर जिल्ह्याच्या गूळ पट्ट्यातून गुळाची आवक होत नाही. पावसामुळे आवक लांबत असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com