कानिफनाथ महाराज यात्रेला सुरवात

मढी, जि. नगर : श्री क्षेत्र मढी येथे ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरवात झाली. या वेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.  (छायाचित्र : संजीव कुटे, पाथर्डी)
मढी, जि. नगर : श्री क्षेत्र मढी येथे ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरवात झाली. या वेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. (छायाचित्र : संजीव कुटे, पाथर्डी)

नगर ः नाथ पंथाचे श्रद्धास्थान आणि भटक्‍या समाजाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेला आजपासून (मंगळवारी) सुरवात झाली. यात्रेनिमित्त येथे भरत असलेला गाढवांचा बाजार राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. यंदाही येथे भरलेल्या गाढवांच्या बाजारात तीन हजारहून अधिक गाढवे विक्रीला आली आहेत. पंधरा दिवस चालणारी ही यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे.

नगर-पाथर्डी रस्त्यावरून दक्षिणेला गर्भगिरी डोंगरांच्या कुशीत मढी (ता. पाथर्डी) येथे कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. त्यांनी रंगपंचमीला समाधी घेतल्याने यात्रेत या दिवसाला महत्त्व आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून अठरापगड जातींचे भक्त येथे नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी रंगपंचमीपासून येत असतात. नाथांच्या कार्यकाळात व कानिफनाथ गडाच्या उभारणीत गोपाळ समाजाचे योगदान मोठे होते, म्हणून येथील होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाला आहे. 

यंदा गुरुवारी (ता. १) हरिदास काळापहाड, हरिभाऊ हंबीरराव, नामदेव माळी, पुंडलिक नवघरे, माणिक लोणारे, सुंदर गिऱ्हे यांच्या हस्ते होळी पेटवून व कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला टेकवून यात्रेला सुरवात झाली. मात्र खऱ्या अर्थाने यात्रा रंगपंचमीपासूनच सुरू होते. आजपासून येथे राज्य व राज्याबाहेरील भाविकांनी नाथांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. 

गुढीपाडव्याच्या दिवशी महापूजा, गंजाजलाने कानिफनाथांच्या समाधीला अभिषेक करून यात्रेचा समारोप होणार आहे. मढी यात्रेत रेवड्याच्या प्रसादाचा मान आहे. त्यामुळे येथे रेवड्याचीही मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. यंदाही रेवडीला मोठी मागणी आहे. गाढवाच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी आडीच ते तीन हजार गाढवे येतात. यंदाही राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून गाढवे विक्रीसाठी आली आहेत. यंदा गावरान गाढवाला साधारण आठ ते बारा हजार तर काठेवाडी गाढवाला पंधरा ते बावीस हजार दर आहे. 

जातपंचायत झाली बंद मढीच्या यात्रेत भटक्‍या समाजाच्या विविध जातपंचायती बसायच्या. वर्षानुवर्षे जातपंचायती भरण्याची परंपरा कायम होती. जातपंचायतीतून समाजिक, वैयक्तिकसह सर्व वादावर तोडगा काढला जायचा व पंचायतीने दिलेला निर्णय त्या-त्या समाजाला मान्य करावा लागत असे. गेल्या वर्षीपासून जायपंचायती बंद झाल्या आहेत. आता त्याएेवजी समाजाचे मेळावे घेतले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. ५) मढीत भटक्‍या समाजाचा मेळावा झाला. त्यामुळे जातपंचायत बंद झाल्याची मोठी क्रांती समजली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com