कर्जतचे तूर खरेदी केंद्र बंदच; राजकीय कुरघोडी सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः हमीदराने तूर खरेदीसाठी सुरू केलेले कर्जत येथील तूर खरेदी केंद्र आठ दिवसांपूर्वी बंद केल्यानंतर राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. पालकमंत्र्यांनी राजकीय आकसापोटी केंद्र बंद केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी आरोप फेटाळत ‘कर्जत तालुक्‍यात पालकमंत्र्यांनी भरीव कामे केल्यामुळे सहन होत नसल्याने विरोधक आरोप करत आहेत,’’ असे स्पष्ट केले. दुसरीकडे खरेदी केंद्र अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्यावर्षी तूर खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. तुरीवरून बरेच राजकीय वादळही तयार झाले होते. त्यामुळे यंदा असा प्रश्‍न उद्भवू नये, शेतकऱ्यांच्या तुरीची हमी दराने खरेदी व्हावी, यासाठी नाफेडने जिल्हा मार्केटींग फेडरेशनसह नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू केले. त्यात कर्जत व त्याच तालुक्‍यातील मिरजगावचाही समावेश होता. कर्जत केंद्रावर साधारण आठ हजार क्विंटल तूर खरेदी झाली, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणीही केली होती. खरेदी सुरळीत सुरू असताना बुधवारी (ता. ७) जिल्हा मार्केटींग अधिकारी भारत पाटील यांनी संबंधित केंद्राला पत्र देऊन अचानक हे केंद्र बंद करण्यास सांगितले. त्यामुळे येथे तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना तूर विक्री न करताच परत जावे लागले. 

‘प्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार केंद्र बंद केले.’ एवढाच खुलासा नगरच्या जिल्हा मार्केटींग कार्यालयाने केला. तेव्हापासून हे खरेदी केंद्र बंद आहे. शेजारच्या केंद्रावर तूर विक्री करण्याचा सल्ला मार्केटींग फेडरेशनने शेतकऱ्यांना दिला. मात्र तीस ते बत्तीस किलोमीटर तूर नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च कोण करणार? याबाबत मार्केटींग फेडरेशनचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. 

खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्यावर कोणाही बोलायला तयार नाही. उलट खरेदी केंद्र बंद झाल्यावर त्यावरून राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. सुरवातीला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राजकीय आकसापोटी खरेदी केंद्र बंद केल्याचा काँग्रेसकडून आरोप झाले, त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही आरोप फेटाळत आरोप-प्रत्यारोप सुरू केले. ‘‘पालकमंत्र्यांनी कर्जत तालुक्‍यात जोरात कामे केली आहेत.

तालुक्‍यातील शेतकरी पालकमंत्री आणि भाजप सरकारवर खूश आहेत. झालेली चांगले कामे पाहवत नसल्याने तूर खरेदी केंद्राबाबत बिनबुडाचे विरोधक आरोप करत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी रविवारी (ता. ११) नगरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे कर्जतचे तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत असताना त्याबाबत कोणी बोलायला तयार नाही. खरेदी केंद्र बंदच असले तरी, राजकीय आरोप-प्रत्यारोप मात्र सुरूच आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com