कोल्हापुर जिल्ह्यात कृषी विभागात ‘बुरे दिन’

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील कृषी विभागात ‘बुरे दिन’ आल्याचे चित्र आहे. विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असणारा समन्वयाचा अभाव, कृषी विभागात आलेली शिथिलता, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तुटत असलेला संवाद याचा एकत्रित परिणाम कृषी विभागाच्या कामकाजावर झाला आहे. त्यातच कृषी महोत्सवाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ आणि परत केलेला साडेतीन कोटी रुपयांचा निधी यामुळे सध्या कृषी विभागातील वातावरण बिघडल्याचे चित्र आहे. 

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कृषी विभागाचा साडेतीन कोटी रुपयांचा निधी परत गेल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिल्यानंतर कृषी विभागातील कारभार आता सामोर येत आहे. तळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऐकून न घेणे, मधल्या वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा करणे आदी बाबी निधी परत जाण्यास कारणीभूत झाल्याचे बोलले जात आहे. 

तांत्रिक बाबींमुळे निधी परत गेल्याचे कारण कृषी विभागाकडून देण्यात येत असले तरी मंजूर झालेली कामे होणार नाहीत याचा वेळेत अंदाज घेण्यात कृषी विभागाचे कर्मचारी कमी पडल्याचेच दिसून येते. ई-टेडरिंग, प्रत्यक्ष वर्क ऑर्डर, काम सुरू झाले की नाही, ते किती कालावधीत होणार, मार्च अखेरपर्यंत ही कामे होणार की नाहीत, याचा अंदाज घेणे, कामे वेळेत होत नाहीत हे लक्षात येताच त्याची कल्पना वरिष्ठांना देणे, यातून त्या कामकाजाबाबत निर्णय घेणे अशी पद्धती अपेक्षित असताना मार्चच्या अखेरीपर्यंत निधी खर्च करण्याचाच आटापिटा चालला. मात्र, अनेक कामे वेळेत सुरू झाली नाहीत. 

तसेच, काहींची पन्नास टक्केही कामे झाली नाहीत. यामुळे या वेळेत कृषी विभागाला संपूर्ण निधीचा विनियोग करणे शक्‍य झाले नाही. परिणामी शेवटच्या दिवशी कृषी विभागाने हा निधी परत पाठविला. या प्रकारात कोण दोषी, कोणाचे चुकले यापेक्षा कोणत्याही विभागाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने का घेतली नाही, असाच सवाल आता शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.  ज्या कारणांमुळे निधी परत गेला तेच कारण नुकत्याच झालेल्या कृषी महोत्सवाबाबतही आहे. या महोत्सवाच्या आयोजनाबाबत रोखठोक चर्चा न करता काही अधिकाऱ्यांच्या ‘एकाधिकार’शाहीमुळे महोत्सवाकडे शेतकरी फिरकले नाहीत. परीक्षांचे, इतर महोत्सवांचे कारण देत या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण खरे कारण हे समन्वयाचा अभाव हेच असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच निधी परत   राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रत्येक कृषी विभागाच्या कार्यक्रमात विविध घटकांना निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा करत असतात. पण त्यांच्याच जिल्ह्यात कृषी विभागाचा निधी परत जाणे ही बाब दुर्दैवी असल्याची चर्चा आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र सरकारी बाबूंच्या निष्क्रियतेमुळे निधी परत जात आहे.

ऐनवेळीच कारवाईचा बडगा कशासाठी?    जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर लगेच निधी परत गेल्याबद्दल कृषी विभागाला दोषी धरले. असे असले तरी याचा संपूर्ण दोष कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना न देता निधी खर्च होत नसल्याचे पाहून त्या संदर्भातील बैठका वेळीच घेतल्या असत्या तर निधी परत गेला नसता. या कामी कृषी विभागाबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयानेही त्याचवेळी ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी होती, असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com