कर्जमाफीसाठी ९५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी

लोडशेडिंगमुळे ग्रामीण भागात १८-१८ तास वीज नाही. ऑनलाइन कर्जमाफी फॉर्म भरण्यात अडचणी येत असल्याने अर्जाची १५ सप्टेंबरची मुदत वाढवून द्यावी . - धनंजय मुंढे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
कर्जमाफी
कर्जमाफी

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा आज (ता. १५) अखेरचा एकच दिवस आहे. गुरुवारी (ता.१४) दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यभरातील ९५ लाख ४९ हजार ७२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, तर ४८ लाख ८७ हजार ३८७ शेतकरी कुटुंबीयांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही हजारो शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित असल्याने अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यासंदर्भात गुरुवारी (ता. १४) उशिरापर्यंत संभ्रमावस्था कायम होती. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. सुमारे ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असा दावा केला. कर्ज पुनर्गठीत झालेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचे लाभ मिळणार आहेत. तसेच नियमित परतफेड करणाऱ्यांनाही २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. २४ जुलैपासून अर्ज भरून घेण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी (ता.१४) दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यभरातील ९५ लाख ४९ हजार ७२४ शेतकऱ्यांनी नोंदणी ऑनलाइन नोंदणी केली होती, तर ४८ लाख ८७ हजार ३८७ शेतकरी कुटुंबीयांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली होती.  अर्ज भरण्यातील अडचणींच्या डोंगरामुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अर्ज भरण्यासाठी आता केवळ एकाच दिवसाची मुदत शिल्लक आहे. अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड क्रमांक स्वीकारले नाही. अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. परराज्यातील आधार कार्डमधील नंबर अर्ज भरताना नमूद होत नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत. आधार कार्डमधील चुका दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याने मुदतीत अर्ज भरण्याच्या शक्यता मावळू लागल्या आहेत. सर्व्हर डाऊन असल्यानेही अर्ज भरताना अडचणी येत आहेत. 

शुक्रवारीअखेर कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. कामकाजाच्या या अखेरच्या दिवसात उर्वरीत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. त्यामुळे उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारून आधार कार्ड व इतर पूर्ततेसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे. अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या स्तरावर काल उशिरापर्यंत संभ्रमावस्था होती.

राज्यभरातील महा-ई-सेवा, नागरी सुविधा केंद्रे, जिल्हा बँका आणि काही ठिकाणी विविध कार्यकारी विकास सोसायट्यांमध्ये सुद्धा हे अर्ज भरून घेतले जात आहेत. प्रतिक्रिया  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा शब्दच्छल झाला आहे. शेतकरी बाेगस असे काही नाही. १५ सप्टेंबरनंतर आॅनलाइन आलेले अर्ज आणि बॅंकांनी दिलेली माहिती याची छाननी केली जाईल. त्यानंतरच पात्र अपात्र शेतकरी ठरणार आहेत. त्यामुळे कर्जमाफीत शेतकरी बाेगस आहेत असे म्हणता येणार नाही. तसेच शेतकऱ्यांची दिवाळी गाेड व्हायची असेल तर आता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देता येणार नाही. - सुभाष देशमुख,  सहकार व पणनमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com