कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उरले चार दिवस !

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरायला किमान १०० रुपये लागतात. बोटांचे ठसे बदल किंवा अद्ययावतीकरणाचे १५० रुपये सायबर केंद्रचालक घेतात. ही कर्जमाफी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, मनस्तापही होत आहे. - अरुण पाटील, शेतकरी, तरसोद, जि. जळगाव.
कर्जमाफी
कर्जमाफी

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंतिम मुदत चार दिवसांवर आली आहे. शुक्रवारी (ता. १५) अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. शनिवारी (ता. ९) दुपारपर्यंत राज्यभरातील ८० लाख ७३ हजार ६९९ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, ७१ लाख ४० हजार ९२० शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.   फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. सुमारे ८९ लाख लोकांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल असा दावा सरकारने केला आहे. दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. कर्ज पुनर्गठीत झालेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचे लाभ मिळणार आहेत. तसेच नियमित परतफेड करणाऱ्यांनाही २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. परंतु, जाचक अटी, ऑनलाइन यंत्रणेचा अभाव याचा फटका पुन्हा एकदा दुष्काळ नापिकीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना बसला. पीकविमा योजनेत ऑनलाइन पीकविमा उतरविण्याचा गोंधळ संपत नाही तोच कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्याकरिता शेतकऱ्यांची परवड सुरू झाली. सर्व्हर डाउनमुळे शेतकऱ्यांना मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रात्रं दिवस सुविधा केंद्रावर ताटकळण्याची वेळ आली. कर्जमाफीसंबंधी शासनाने अनेक वेळा वेगळवेगळे निर्णय जाहीर केल्यानेही गोंधळ उडाला. त्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. २४ जुलैपासून अर्ज भरून घेण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. गेल्या ८० लाख ७३ हजार ६९९ शेतकऱ्यांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी ७१ लाख ४० हजार ९२० इतके अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कामकाजाच्या या चार दिवसांत उर्वरीत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. अडचणींवर मात करीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असा दावा सहकार खात्यातील उच्चपदस्थांकडून केला जात आहे.  राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करण्याकरिता अाता अवघे चार दिवस उरले अाहेत. ही प्रक्रिया राबविण्यासाठी महा ई-सेवा केंद्र, सुविधा केंद्र तसेच सेतूसह ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध असलेल्या संगणकाचा वापर सुरू केला अाहे. शुक्रवारपर्यंत (ता. १५) अर्ज दाखल करायचे असून सर्वच जिल्ह्यांमध्ये यंत्रणांनी या कामाला प्राधान्य देत विविध उपाययोजना केल्या आहेत.  दहा लाख बोगस अर्ज राज्यभरात ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करतील, अशी अपेक्षा आहे; पण यापैकी सुमारे दहा लाख अर्ज बनावट असल्याचा सरकारचा संशय आहे. त्यामुळे अशा बनावट शेतकऱ्यांनाच ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत आहे; पण उर्वरित ८० लाख शेतकरी मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यास पात्र आहेत. त्याची प्रक्रिया आता जलदगतीने सुरू आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे सोमवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत सांगितले.

असे तपासता येते नाव...  कर्जमाफीमध्ये आपले नाव online यादीत आहे की नाही, हे  http://CSMSSY.in या वेबसाइटवर तपासता येते. संकेतस्थळाच्या खालील बाजूस अर्जदाराची यादी असा विभाग आहे. यात विभाग select केल्यास आणि वेबसाइट उघडल्यावर आपला जिल्हा, तालुका व गाव निवडता येते. यात आपल्या गावाची यादी समोर येते. आपले नाव यादीत असल्याची खात्री करता येते. नसल्यास परत फॉर्म भरावा लागतो. माहिती दुरुस्ती करता येते.

आॅनलाइन अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी 

  •  महाराष्ट्राबाहेरील आधार कार्डमधील क्रमांक नमूद होत नाही
  •  वृद्ध शेतकऱ्यांच्या बोटांच्या ठश्‍यांचा प्रश्‍न कायम
  •  आधार कार्ड नसलेले शेतकरी वंचित
  • आधार कार्डमधील चुका दुरुस्तीला वेळ लागत असल्याने अर्ज भरण्यात अडचणी
  •  आधी ऑनलाइन अर्ज भरा नंतर आम्ही स्वीकारतो, या गटसचिवांच्या भूमिकेने शेतकऱ्यांची अडवणूक  
  • अनेक सीएससी, आपले सरकार केंद्रे नुसती नावालाच
  • प्रतिक्रिया कर्जाचा बोजा झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफीची योजना आणली. परंतु, ज्या शेतकऱ्यांना कर्जच मिळाले नाही त्यांच्यासाठी काय? कर्ज उचलणाऱ्याबरोबरच कर्ज न मिळालेल्यांनाही दुष्काळाचा, नापिकीचा सामना करावा लागला. त्यांना शासनाने आधार द्यायला हवा. - सूर्यकर्ण येवले, रुई, ता. गेवराई, जि. बीड

    कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अामच्या भागात कनेक्टिव्हीची मोठी समस्या अाहे. शेजारच्या गावात जाऊन अाम्ही अर्ज भरले. परंतु अजून अनेक शेतकरी राहिले अाहेत. अाता चार दिवस राहिले. या काळात सर्वांचे अर्ज भरणे शक्य दिसत नाही. त्यामुळे शासनाने किमान १५ दिवस तरी मुदतवाढ दिली पाहिजे. तरच कर्जमाफीचा फायदा होईल.    - अनंता भिकाजी इंगळे, चितलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com