कर्जमाफीपासून पुणे जिल्ह्यात दीड लाख शेतकरी वंचित?

मी लागोपाठ तीन दिवस अर्ज भरण्यासाठी गेलो होतो; परंतु शेतकऱ्यांची गर्दी पाहता भरताना अडचणी आल्या. याशिवाय सर्व्हरच्या अडचणी; तसेच शासकीय केंद्राची संख्या कमी असल्यामुळे खासगी केंद्रात शेतकरी अर्ज भरत आहेत. तेथेही प्रतिव्यक्ती शंभर ते दीडशे रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही एक प्रकारे लूटच सुरू असल्याचे दिसून येते. - प्रल्हाद वरे, शेतकरी, मळद, ता. बारामती, जि. पुणे.
पुणे पीककर्ज वाटप
पुणे पीककर्ज वाटप

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचे अर्ज भरताना शेतकऱ्यांना सर्व्हरची अडचण येत आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता.१३) अंदाजित तीन लाख ३९ हजार खातेदारांपैकी एक लाख ९७ हजार ८९५ खातेदारांचे कर्जमाफीसाठी अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याचा कालावधी बघता सुमारे एक लाख ४१ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

शासनाने कर्जमाफी भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यत ही अंतिम मुदत दिली आहे. आता अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी ‘आपले सरकार’, ‘महा ई-सेवा-केंद्र’ आणि नागरिक सुविधा केंद्र अशी एकूण दोन हजार २६८ केंद्र सुरू आहेत. परंतु अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना अजून मुदत वाढवून देण्याची अपेक्षा होती. मात्र, शासन स्तरावरून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे दिसून आल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी केंद्रांवर गर्दी करत आहेत.

 सध्या ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्‍टिव्हीटी, इंटरनेटचा स्पीड आणि नेटवर्कच्या अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यास वेळ लागत आहे. याशिवाय अर्ज भरताना आवश्‍यक असणारे आधार कार्ड, त्यावर असलेली चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत.जिल्ह्यात तीन लाख ३९ हजार अंदाजित खातेदार आहे. तीन लाख ९० हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात एक लाख ९७ हजार ८९५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भाग असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍यात शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक केंद्रचालक रात्री उशिरापर्यंत अर्ज भरत आहेत; तसेच सुरवातीच्या काळातील पंधरा दिवस अनेक भागांत बायोमेट्रिकची सुविधा नव्हती. त्यामुळे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या. एकंदरीत शिल्लक अर्जाची संख्या पाहता लाखांहून अधिक शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

याविषयी सहकार उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु ग्रामीण भागात सर्व्हरच्या समस्या आहेत. त्यामुळे शासनाने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची गरज आहे, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com