मराठवाडा, खानदेशात ८५ लाख टन उसाचे गाळप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी ८४ लाख ९७ हजार ५४६ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ८४ लाख ६८ हजार ९०४ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांपैकी बारा कारखान्यांचा सरासरी साखर उतारा दहा टक्‍क्‍यांपुढे राहिला. तर ऊस गाळप करणाऱ्या सर्व तेवीस कारखान्यांचा सरासरी साखर उतरा ९.९७ टक्‍के राहिल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद येथील साखर विभागाच्या कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह खानदेशातील जळगाव व नंदूरबार या दोन जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांमध्ये नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी तीन, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच व बीड जिल्ह्यांतील सात कारखान्यांचा समावेश होता. 

यापैकी नंदूरबार जिल्ह्यातील तीनही कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील दोन, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, जालना जिल्ह्यातील पाच व बीड जिल्ह्यातील सहा कारखान्यांचा गाळप हंगाम गुंडाळला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी धुराडी थांबण्यापूर्वी ११ लाख १८ हजार ३५२ टन उसाच्या गाळपातून ११ लाख २३ हजार ७८० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. तीनही साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.०५ टक्‍के राहिला. जळगाव जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ३ लाख ८६ हजार ११२ टन उसाच्या गाळपातून ३ लाख ४५ हजार २९० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. तीनही साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.९४ टक्‍के राहिला. 

जालना जिल्ह्यातील साखर उतारा १०.१९ टक्के औरंगाबाद जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १४ लाख ४३ हजार २२७ टन उसाचे गाळप करत १४ लाख ३५ हजार ३२७ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. पाचही साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९५ टक्‍के राहिला. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी २१ लाख ५ हजार २५५ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून २१ लाख ४४ हजार ३४१ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले. पाचही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला असून, या कारखान्यांचा यंदाच्या हंगामातील सरासरी साखर उतारा १०.१९ टक्‍के राहिला आहे. बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी ३४ लाख ४४ हजार ६०० टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ३४ लाख २० हजार १६६ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले. सातही साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९३ टक्‍के राहिला. गाळप हंगाम सुरूच असलेले पाचही कारखाने औरंगाबाद जिल्ह्यातीलच असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com