दहा हजारांहून अधिक गावांची पाणीपातळी खालावली

दहा हजारांहून अधिक गावांची पाणीपातळी खालावली
दहा हजारांहून अधिक गावांची पाणीपातळी खालावली

पुणे : उन्हाचा चटका वाढू लागला असून, पाणीपातळीदेखील खालावत आहे. राज्यातील तब्बल दहा हजार ३८२ गावांत पाणीपातळी खालावली आहे. त्यापैकी ७ हजार २५६ गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. तर, विदर्भातील बहुतांश गावांची पाणीपातळी खालावल्याने येत्या काही दिवसांमध्ये विदर्भातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विदर्भातील भूजलपातळीत मोठी घट झाली आहे.  तीन हजार ९२० विहिरींचे निरीक्षण  भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत राज्यातील पाणलोट क्षेत्रनिहाय तीन हजार ९२० निरीक्षण विहिरींतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्याची मागील पाच वर्षातील जानेवारी महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलना केली असता राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी २४१ तालुक्यांमधून दहा हजार ३८२ गावांत भूजलपातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. एक हजार ३७६ गावांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त तर दोन हजार ४६० गावांमध्ये दोन ते तीन मीटर आणि सहा हजार ५४६ गावांमध्ये एक ते दोन मीटरएवढी घटली असल्याचा निष्कर्ष काढला आला आहे. 

पडलेल्या पावसाचे केले सर्वेक्षण  यंदा राज्यातील जून ते सप्टेंबर महिन्यातील पडलेल्या पावसाचा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण ३५३ तालुक्यांपैकी ९७ तालुक्यांत ०.२० टक्के घट आढळून आली. तर ४५ तालुक्यांत २०.३० टक्के, ८० तालुक्यांत ३० ते ५० टक्के घट झाली. १९ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान घटले असून ११२ तालुक्यांत सरासरी आणि त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्याचे नमूद करण्यात आले. भूजलपातळीत शून्य ते एक मीटरने घट आढळून आलेल्या गावांत पाणीटंचाईची शक्यता कमी असून ती नियंत्रित ठेवण्यासारखी असते. शासन निर्णयातील निकषानुसार पर्जन्यमानामध्ये वीस टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी सांगितले.   

सरकारला कराव्या लागणार उपाययोजना  गेल्या काही वर्षापासून पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. ही पाणीटंचाई कमी करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार अभियानासारखी योजना आणून राज्यातील ओढे, नाले खोलीकरण व रुंदीकरण केले, गाळ उपसला, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. पावसाळ्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे बहुतांशी धरणे भरली. जलयुक्तच्या कामामुळे भूजलपातळी वाढली असली तरी कोकणात ठाणे विभागातील १९६ गावे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक विभागातील ८६६ गावे, पुणे विभागातील २२५ गावे, मराठवाड्यातील २६६० गावे, विदर्भातील अमरावती विभागातील ३९८१ गावे, नागपूर विभागातील २४५४ गावांमध्ये एक मीटर पाणीपातळी खोल गेली आहे.     

भूजलपातळी खालावण्याची कारणे  

  • पिकांसाठी पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती  
  • बारामही ऊस, केळी, संत्री, द्राक्षे अशा पिकांसाठी 
  • भूजलाचा अतिवापर 
  • भूजल व्यवस्थापनाचा अभाव 
  • कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण 
  • पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी 
  • पावसाळ्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली होती. विदर्भात पावसाने सरासरीही गाठली नसल्याने विदर्भात भूजल पातळी वाढली नाही, असे अभ्यासाअंती दिसून आले. उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात अधिक पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

    - शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे 

    पाणीटंचाई कालावधीसाठी खालील गृहीतके धरली जातात
    क्षेत्र पर्जन्यमानातील तूट (टक्के) स्थिर पाणीपातळीतील तूट संभाव्य टंचाई कालावधी 
    अवर्षणप्रवण व शाश्वत पर्जन्यमान २० टक्क्यांपेक्षा जास्त तीन मीटरपेक्षा जास्त ऑक्टोबरपासून पुढे 
         दोन ते तीन मीटर जानेवारीपासून पुढे 
         एक ते दोन मीटर एप्रिलपासून पुढे 
        शून्य ते एक मीटर मँनेजेबल टंचाई
    अतिपर्जन्यमान ५० टक्क्यांपेक्षा जास्त   दोन ते तीन मीटर जानेवारीपासून पुढे
        एक ते दोन मीटर एप्रिलपासून पुढे
    विभागनिहाय भूजलपातळी खालावलेल्या गावांची संख्या
    विभाग तीन मीटरहून अधिक दोन ते तीन मीटर एक ते दोन मीटर एक मीटरपेक्षा जास्त
    ठाणे १८९ १९६
    नाशिक ११६ २११ ५३९ ८६६
    पुणे २० ४१ १६४ २२५
    औरंगाबाद ५३१ ७२५ १४०४ २६६०            
    अमरावती ५४४ १०२६ २४११ ३९८१
    नागपूर १६५ ४५० १८३९ २४५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com