संत्रा पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट झाले गडद

पाण्याअभावी सुकत असलेली संत्रा बाग.
पाण्याअभावी सुकत असलेली संत्रा बाग.

अमरावती ः भूगर्भातील खालावत चाललेली पाणीपातळी त्यामुळे संरक्षित सिंचन पर्यायांनी गाठलेला तळ, यामुळे जिल्ह्यात संत्रा उत्पादकांसमोर बागा टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पाण्याची सोय करणे शक्‍य होत नसल्याच्या परिणामी काटपूर येथील शेतकरी पंकज चोंधे यांच्याकडून तब्बल २५० संत्रा झाडांची तोड करण्यात आली. 

विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. यातील ८५ ते ९० हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असल्याचे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेकडून सांगितले जाते. यातील सर्वाधिक लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. यामध्ये वरुड, मोर्शी तालुक्‍यांचा समावेश आहे. यावर्षी मात्र संत्रा बागायतदारांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून झालेले अत्यल्प पर्जन्यमान हे त्यामागील एक मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. पाऊस कमी झाल्याच्या परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत गेली; त्याचा फटका बसत या भागातील विहिरी आणि इतर संरक्षित सिंचनाचे पर्यायदेखील कोरडे पडले. उन्हाळ्यात संत्रा बागाची पाण्याची सोय करण्याचे आव्हान यामुळे शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.  शेतकऱ्याने फिरविली जेसीबी

संत्रा बागेची पाण्याची सोय करणे शक्‍य नसल्याची जाणीव झाल्याने काटपूर येथील पंकज लोंधे या शेतकऱ्याने आपल्या बागेवर जेसीबी फिरविली. ममदापूर शिवारातील सर्व्हे क्रमांक ३१६ मधील दोन एकरातील २५० संत्राझाडे त्यांनी जेसीबीच्या साह्याने काढून टाकली. 

उपाययोजनांची गरज विश्रोळी धरणातून कासी नदी व चारघड नदीपात्रात पाणी सोडून ते काठावरील सिमेंट प्लगमध्ये साठविल्यास काटपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या संत्रा बागा जगविण्याचा प्रश्‍न निकाली निघू शकतो. त्याकरिता संबंधित प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

यावर्षी संत्रा उत्पादकांना बागा वाचविण्यासाठी मोठ्या पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. आंबीया बहाराची छोट्या आकाराची फळे सध्या झाडावर आहेत. आंबीया बहार यावर्षी चांगला फुटला; परंतु त्याला पाण्याची गरज आहे. अन्यथा फळगळ होऊ शकते. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत त्याची फळे मिळतात. जुलै महिन्यात मृगाची फुलधारणा होते. जानेवारी ते मार्चमध्ये मृगाचे उत्पादन मिळते. परंतु पाण्याअभावी झाडांचे अस्तित्व कसे राखावे हाच प्रश्‍न आहे.

- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com