कोयना धरणातील पाणीसाठा २५ टीएमसीने वाढविण्याचा प्रस्ताव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोयना धरणामध्ये २५ टीएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने सरकारकडे सादर केला आहे. परंतु, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या धरण क्षेत्रातील पुनर्वसित गावांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत कोयना धरण प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अनेक गावे पुनर्वसित झालेली आहेत. परंतु पुनर्वसित गावांना सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तसेच कोयना धरणात २५ टीएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच पुनर्वसित गावांतील शेतकऱ्यांना जमिनी परत मिळालेल्या नाहीत. तसेच मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे शिवसेनेचे प्रतोद व आमदार शंभुराजे देसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, पाटण तालुक्यातील ५४ पुनर्वसित गावांपैकी २१ गावांचे खासगी जागेवर पुनर्वसन झालेले आहे. या गावांना १८ सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सरकारने निर्णय घेतला. परंतु, त्यातील कामांची वर्गवारी केली असता १३ कामे करण्यास अडचणी येत आहे. तसेच कोयना धरणात २५ टीएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून सादर करण्यात आलेला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुनर्वसित गावांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी ३ कोटी २९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून १५ दिवसांत निविदा काढण्यात येतील. त्याचबरोबर विशेष बाब म्हणून या गावांना सुविधा पुरविल्या जातील. 

मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना अवगत करणार  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, कणकवली, वैभववाडी, मालवण आणि देवगड तालुक्यातील १५ गावांत वणवा पेटल्याने शेतकऱ्यांच्या फळबाग जळून खाक झाल्या. या फळबागांचे पंचनामे करण्यात आले. परंतु वणव्यामुळे नुकसान झालेल्या फळबागांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्यामुळे मदत मिळवून देण्याकरिता मुख्यमंत्र्यांना अवगत करून दिले जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वणवा लागून चे झालेले नुकसान याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती.

वसंतराव नाईक सभागृहाचे भूमिपूजन १ जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सभागृह उभारण्यासाठी विद्यापीठ परिसरातील पांढरा बोर्ड येथील ७ एकर जमीन महिन्याभरात उपलब्ध करून दिली जाईल. १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीला सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली. सुनील केदार, अमिन पटेल आदी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com