राज्यात रब्बी क्षेत्र वाढण्याची शक्‍यता

राज्यात रब्बी क्षेत्र वाढण्याची शक्‍यता

अकोला : पावसाचे जवळपास साडेतीन महिने होऊनही वऱ्हाड-विदर्भात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस पडल्याने या वर्षी राज्याच्या रब्बी क्षेत्रात दोन लाख हेक्‍टरपेक्षा अधिक वाढ होऊ शकते, असा  अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

रब्बीच्या दृष्टीने आढाव्यासाठी गुरुवारी (ता. १४) पुण्यात बैठक होत आहे. त्यामध्ये रब्बीच्या अनुषंगाने सर्वांगीण चर्चा होणार आहे. कमी पावसामुळे गेल्या काही रब्बी हंगामात पूर्ण लागवडसुद्धा झाली नव्हती. यात विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला होता.

या वर्षी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस बऱ्यापैकी होत आहे. प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील पावसाची स्थिती, जलसाठा अधिक असल्याने त्याचा रब्बीसाठी फायदा होण्याची स्थिती असल्याचे सांगितले जाते.

राज्यात प्रामुख्याने हरभरा, रब्बी ज्वारी वाढीची शक्‍यता आहे. राज्यात हरभऱ्याचे १३ लाख ६५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. या वर्षी हे क्षेत्र १५ लाख हेक्‍टरचा आकडा ओलांडू शकते. दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात घेतली जाणारी रब्बी ज्वारीदेखील सव्वातीन लाख हेक्‍टरवरून चार लाख हेक्‍टरचा टप्पा पार करू शकते.

पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांना तडाखा बसलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बीकडून अपेक्षा लावून आहेत. त्यातच या वर्षात विदर्भ सोडता इतरत्र पाऊस चांगला आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता या वर्षी राज्यात रब्बीची दमदार वाटचाल राहण्याची शक्‍यता आहे.

विदर्भात फटका बसण्याची शक्‍यता या मोसमात अद्यापपर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही. जेमतेम पावसावर खरिपाची पिके टिकून आहेत. परतीचा पाऊस विदर्भ-वऱ्हाडात रमला तर रब्बी साधू शकतो. मात्र पावसाने आतापर्यंतची तूट न भरल्यास रब्बी हंगामावरही परिणाम दिसू शकतो. रब्बीत वऱ्हाडात हरभरा हे मुख्य पीक आहे. शिवाय खरीप गेल्याने शेतकरी रब्बीकडे डोळे लावून बसले आहेत.

रब्बीसाठी पीककर्जाची चिंता

कर्जमाफीच्या घोषणेमुळे या वर्षाच्या कर्जवाटपाच्या प्रक्रियेवर थेट परिणाम झाला. असंख्य जिल्ह्यांमध्ये कर्जवाटपाची स्थिती १० ते ३५ टक्‍क्‍यांदरम्यान आहे. परिणामी, खरिपाच्या पीक कर्जवाटपाची स्थिती चांगली नसताना किमान रब्बीसाठी तरी पीककर्ज मिळेल काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

राज्यातील प्रमुख रब्बी पिके व क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ज्वारी      ३ लाख १६ हजार गहू         ९ लाख ६७ हजार हरभरा     १३ लाख ६५ हजार करडई      १ लाख २४ हजार एकूण      २७ लाख ७२ हजार अपेक्षित   २९ लाख ५० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com