राज्यात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन होणार

राज्यात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन होणार
राज्यात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन होणार

पुणे  : राज्यात उसाच्या जादा गाळपामुळे भरपूर मळी उपलब्ध होत आहे. त्यामुळे यंदा इथेनॉलचे उत्पादन विक्रमी म्हणजे ५० कोटी लिटरच्या आसपास राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

"भारतीय ऑइल कंपन्यांकडून राज्यातील साखर कारखान्यांचे इथेनॉल विकत घेतले जाते. ऑइल कंपन्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक कारखान्याकडे इथेनॉल तयार आहे. मात्र, इथेनॉल उचलण्याचा या कंपन्यांचा वेग कमी आहे. इथेनॉल विक्रीचे करार ४२ कोटी लिटरपेक्षा जास्त झालेले आहे. मात्र, इतर राज्यांतूनदेखील इथेनॉलची मागणी वाढल्यामुळे उत्पादन ५० कोटी लिटरच्या आसपास राहील," अशी माहिती इथेनॉल उद्योगातील सूत्रांनी दिली. 

गुजरात, गोवा, आंध्र प्रदेशातूनदेखील महाराष्ट्राच्या इथेनॉलसाठी मागणी येत आहे. गेल्या हंगामात कारखान्यांकडून इथेनॉलचा पुरवठा कमी होता. त्यामुळे कंपन्यांनी कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. यंदा स्थिती उलटी असून, कंपन्यांकडून अपेक्षित उचल होत नसल्याचे कारखान्यांचे म्हणणे आहे. 

इंधनात पाच टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण करण्याची अधिसूचना २००६ मध्ये केंद्र शासनाने काढली होती. मात्र, टक्केवारीत वाढ करून २०१३ पासून मिश्रणाचे प्रमाण दहा टक्के करण्यात आले. यामुळे देशातील साखर कारखान्यांना उपपदार्थ निर्मितीत आधार देणारा पदार्थ म्हणून इथेनॉलने जागा घेतली आहे. 

देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि झारखंड या राज्यांनाच दहा टक्के इथेनॉल मिश्रणाची मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित राज्यात हेच प्रमाण पाच टक्के आहे. राज्यातील सहकारी, खासगी आणि स्टॅंड अलोन इथेनॉल युनिटमधून यंदा ४३ कोटी ५८ लाख लिटर इथेनॉल खरेदीचे उद्दिष्ट ऑईल कंपन्यांनी ठेवले आहे. कंपन्यांकडून निविदा काढल्यानंतर कारखान्यांना इथेनॉल पुरवठ्यासाठी निविदा भराव्या लागतात. त्यानंतर कंपन्यांकडून कोटा मंजूर होतो. 

"साखर कारखान्यांनी यंदा ३० नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत ४७ कोटी ३८ लाख लिटर इथेनॉल पुरविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, कंपन्यांनी ४३ कोटी ३८ लाख लिटर इतकाच कोटा मंजूर केला आहे. त्यापैकी आतापर्यंत साडेसात कोटी लिटरपेक्षा जास्त इथेनॉलचा पुरवठा या कंपन्यांना करण्यात आलेला आहे," असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

साठवणक्षमता वाढविण्याकडे कंपन्यांचे दुर्लक्ष साखर कारखान्यांचे इथेनॉल विकत घेतल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच होत असतो. तथापि, ऑइल कंपन्या इथेनॉल घेताना सतत नाक मुरडतात. इथेनॉलचा पुरवठा वाढला तर भविष्यात कच्च्या तेलाच्या खरेदी-विक्रीत होणारे पारंपरिक ''घोळ'' घालण्यात मर्यादा येतील, अशी भीती ऑइल कंपन्यांच्या लॉबीला वाटते. त्यामुळे इथेनॉलची साठवण क्षमतादेखील वाढविण्यास कंपन्या इच्छुक नाहीत. त्यामुळे कारखान्यांचे इथेनॉल वेळेत उचलण्यास, पुरवठा करण्यास सतत अडचणी येतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com