माॅन्सूनच्या परतीचा प्रवास पुढील आठवड्यापासून?

सध्या राजस्थानच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवस परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता कमी आहे. पुढील आठवड्यात या भागातील पाऊस थांबल्यास परतीचा पाऊस सुरू होईल. त्याचा अंदाज चार ते पाच दिवस आधी हवामान विभाग जाहीर करेल. - पी. सी. एस. राव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे
माॅन्सुन फोटो
माॅन्सुन फोटो

पुणे ः राजस्थानच्या पश्चिम भागात अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास उशिराने होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या पाच ते सहा दिवसांत तरी माॅन्सूनच्या परतीचा प्रवास होण्याची शक्यता कमी आहे. परंतु पुढील आठवड्यात, सोमवार (ता. १८) नंतर या भागातील पाऊस थांबल्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे, असे संकेत हवामान विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजस्थानच्या पश्चिम भागातील पाऊस थांबल्यानंतर पाच दिवस आधी परतीच्या पावसाचा अंदाज दिला जाणार आहे. देशात साधारणपणे एक सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास होण्याचा अंदाज असतो. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देशाच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. ही स्थिती अजून पाच ते सहा दिवस राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, उत्तराखंड, गुजरात, झारखंड या भागांतही पाऊस पडत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीला अनुकूल स्थिती अजून तरी तयार झालेली नाही.  परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. त्या वेळी राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या भागांतील पाऊस थांबतो. त्या वेळी उत्तरेकडील हवेचा दाब वाढलेला असतो. तर दक्षिणेकडील हवेचा दाब कमी असतो. त्याच वेळी ईशान्येकडील हवेचा दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतात. टप्याटप्याने हे वारे दक्षिणेकडे सरकल्याने मॉन्सूनचा परतीचा पाऊस सुरू होतो.  महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागांत परतीचा पाऊस चांगला पडतो. कोकणात हा पाऊस कमी होतो. दक्षिणेकडील तमिळनाडूच्या भागात हा परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरपर्यंत सुरू असतो. गेल्या दहा वर्षांतील पावसाचा परतीचा प्रवास लक्षात घेतला असता, २०१३ मध्ये नऊ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर २०१५ मध्येही चार  सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता, असे दिसून येते. यंदा १८ सप्टेंबरनंतर पोषक हवामान झाल्यास परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.  मागील दहा वर्षांतील  मॉन्सूनच्या परतीची वेळ २००७ ः ३० सप्टेंबर  २००८ ः २९ सप्टेंबर  २००९ ः २६ सप्टेंबर   २०१० ः २७ सप्टेंबर  २०११ ः २३  सप्टेंबर  २०१२ ः २४ सप्टेंबर  २०१३ ः ९ सप्टेंबर  २०१४ ः २३ सप्टेंबर  २०१५ ः ४ सप्टेंबर  २०१६ ः १५ सप्टेंबर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com