शेतमालाचे लिलाव सुरू करा, अन्यथा गाळे, भूखंड जप्त करू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोखीने, आरटीजीएस, तसेच एनईएफटीद्वारे रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे नांदगाव येथे आठवड्यापासून शेतमालाचे लिलाव बंद आहेत. याबाबत तीन दिवसांत खुलासा करावा, लिलाव सुरू करावेत, अन्यथा गाळे, गोदाम व भूखंड जप्त करू, अशा नोटिसा बाजार समितीने २१ व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.

नांदगाव बाजार समितीसह न्यायडोंगरी व बोलठाण उपबाजार समितीतील ८९ व्यापारी शेतीमाल खरेदी केल्यानंतर पुढील तारखांचे धनादेश देत असल्याने शेतकऱ्यांना पैसे त्वरित मिळत नव्हते, याबाबतच्या तक्रारीनंतर  जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्तीच्या नोटिसा दिल्या. ही नामुष्की आपल्यावर येऊ नये म्हणून या बाजार समितीने व्यापाऱ्यांना धनादेशाऐवजी रोखीने किंवा आरटीजीएस, तसेच एनईएफटीद्वारे पैसे देण्यास सांगितले, मात्र व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने समितीने २ मेपासून लिलाव बंद ठेवले आहेत. ३ मे पासून न्यायडोंगरी व बोलठाण उपबाजारात व्यापाऱ्यांनी सहभाग घेतल्याने लिलाव सुरू झाले. मात्र, नांदगावला सहा दिवस उलटूनही लिलाव ठप्पच आहेत. 

अखेर आज बाजार समितीने या २१ व्यापाऱ्यांकडूना बुधवारपर्यंत खुलासा मागविला आहे, तो न आल्यास समितीने दिलेले गाळे, भूखंड, गोदामे जप्त का करण्यात येऊ नयेत, अशी विचारणा करण्यात आल्याची माहिती सचिव ए. पी. खैरनार यांनी दिली. व्यापाऱ्यांनी आडमुठेपणा कायम ठेवल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com