टेंभू उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन सुरू

शिवाजीनगर, जि. सांगली  ः येथील (ता. कडेगाव) कालव्यातून टप्पा क्र.२ कडे निघालेले टेंभूचे पाणी. (संतोष कणसे)
शिवाजीनगर, जि. सांगली ः येथील (ता. कडेगाव) कालव्यातून टप्पा क्र.२ कडे निघालेले टेंभूचे पाणी. (संतोष कणसे)

सांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्‍यांसाठी हे आवर्तन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पहिले आवर्तन सुमारे एक ते दीड महिना सुरू होते. त्यानंतर योजना बंद करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपूर्वी या योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होण्यास मदत होईल. सद्यःस्थितीला  सुमारे १२ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाल्याने ऊस पिकासह भाजीपाला पिकांना जीवदान मिळणार आहे, तर टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे, तर आज टेंभूचे पाणी शाळगाव तलावात दाखल झाले. सध्या सर्वत्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिकांची अवस्था बिकट झाल्याने टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. 

शेतकऱ्यांच्या मागणीवरून टेंभूचे उन्हाळी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले. त्यासाठी टप्पा क्र. १ (अ) येथील १९५० अश्‍वशक्तीचे सतरा पंप व टप्पा क्र. १ (ब) येथील २००० अश्‍वशक्तीचे सतरा पंप सुरू करण्यात आले आहेत.

सध्या हे पाणी शिवाजीनगर येथील लघुपाटबंधारे तलावात पोचले आहे. त्यानंतर शनिवारी (ता. १४) टप्पा क्र. २ येथील १४०० अश्‍वश्क्‍तीचे दोन पंप सुरू करून सर्वप्रथम कामथी कालव्यात पाणी सोडण्यात आले. ते कामथी कालव्यातून कामथी, शिवाजीनगर, रेणूशेवाडी, विहापूर, शाळगाव, करांडेवाडी, बोंबाळेवाडीपर्यंत १५ कि.मी.पर्यंत असे शाळगाव तलावात पोचले आहे. हा तलाव कोरडा पडला होता; परंतु या तलावात पाणी सोडल्यामुळे येथील पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कामथी कालव्याचे लाभक्षेत्र भिजल्यानंतर सुर्ली कालव्यात पाणी सोडले जाणार असून, या कालव्यातून हे पाणी सुर्ली, खंबाळे औंध, नेर्ली अपशिंगे, कोतवडे, कडेगाव असे २२ कि.मी.पर्यंत दिले जाईल. त्यानंतर हे पाणी कडेगाव लघुपाटबंधारे तलावात सोडण्यात येणार आहे, तर मुख्य जोड कालव्यातून टेंभूचे पाणी हिंगणगाव बुद्रुक तलावात पोचले आहे. त्यानंतर ते पुढे माहुलीकडे सोडण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com