सातारा : मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात प्रतिसाद वाढला आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून ३०५२ अर्ज प्राप्त झाले असून ६५७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानपोटी तीन कोटी २८ लाख ९२ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरेल, या उद्देशाने राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे.
या योजनेतून जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योजना जाहीर होऊनही सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर मात्र या योजनेस प्रतिसाद वाढला आहे.
जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ३०५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २५०३ अर्ज पात्र तर ४९९ अर्ज अपात्र ठरले असून ४७ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २१४० अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. १७५१ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ७१८ शेततळ्यांचे काम सुरू असून ६५७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
६३६ शेततळ्यांना अनुदान म्हणून ३ कोटी २८ लाख ९२ हजार रुपये वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना या योजनेत लाभ घेता येत असतानाही पश्चिमेकडील तालुक्यातून या योजनेस कमी प्रतिसाद मिळत आहे.