नाशिक : गत सप्ताहात राज्यातील टोमॅटो उत्पादक असलेल्या नगर, नाशिक जिल्ह्यांतून बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या टोमॅटो मालात दुपटीने वाढ झाली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत आवक वाढली. या स्थितीत टोमॅटोला प्रति २० किलोला ५० ते ३५० रुपये तर सरासरी १८० रुपये दर मिळाला. येत्या सप्ताहात हे दर स्थिर राहतील असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.
कर्नाटक व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खरीप व लेट खरीप टोमॅटोची लागवड होते. दरवर्षी कर्नाटक राज्यातील हंगाम आटोपल्यानंतर महाराष्ट्रातील हंगाम सुरू होतो. यंदा नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील हंगाम ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाला.
दरम्यान, सप्टेंबर अर्धा होऊनही कर्नाटक राज्यातील हंगाम सुरू आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक व नगर या टोमॅटोच्या आगारात टोमॅटोची आवक वाढलेली आहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ऑगस्ट महिन्यात सरासरी ६० हजार क्रेटची आवक होती. त्या दरम्यान १५ ऑगस्टनंतर चार दिवस टोमॅटोचे प्रति २० किलोचे दर १०० ते १२०० व सरासरी ५५० रुपये होते. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यानंतर आवकेत वाढ होत गेली.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात सरासरी २० किलो वजनाच्या सरासरी दीड लाख क्रेटची आवक होत आहे. या स्थितीत बांगलादेशमधील बाजारपेठेतून होणारी आवक स्थिर आहे. दरम्यान, दर प्रति २० किलोला ५० ते ३५० रुपये तर सरासरी १८० पर्यंत स्थिर झाले आहे. रविवारी (ता.१७) कळवण बाजार समितीत मात्र दर प्रति २० किलोला ३० ते ६० रुपयांपर्यंत होते. उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर निघाल्याने शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला माल बाजार आवारात फेकून दिला.
या स्थितीत येत्या काळात मागणी व दरात फार मोठे फरक पडतील अशी स्थिती नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता.२२) मोहरम आहे. शुक्रवार (ता.२२) ते शनिवार (ता.३०) या दरम्यान बांगलादेशकडे जाणारा माल दरवर्षी बंद होतो. त्याचाही परिणाम बाजारावर झाला आहे.
बांग्लादेशासाठी माल पाठविणाऱ्या बहुतांश मोठ्या व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. पाकिस्तान हा भारतीय टोमॅटोचा आयातदार देश आहे. मागील वर्षापासून सीमा बंद असल्याने टोमॅटो मालाचा निपटारा होऊ शकत नाही. या स्थितीत टोमॅटोचे मार्केट सप्टेंबरअखेरपर्यंत स्थिर राहील. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन माल बाजारात येईल. त्या काळात मागणी व दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.